कोल्हापूर : शहरातील रस्ते विकास प्रकल्पाच्या मूल्यांकनाची रक्कम निश्चित करून ती देण्याचा अंतिम निर्णय होत नाही, तोपर्यंत कोणत्याही परिस्थितीत आयआरबी कंपनीला टोलवसुली करू दिली जाणार नाही, अशी स्पष्ट ग्वाही बुधवारी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सर्वपक्षीय टोलविरोधी कृती समितीला दिली. दरम्यान, टोलवसुली सुरू होऊ नये आणि राज्य सरकारने लवकरात लवकर निर्णय घेऊन टोल कायमचा रद्द करावा, या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी कृती समितीने बुधवारी सकाळी तासभर ठिय्या आंदोलन केले. रस्ते विकास प्रकल्पाच्या मूल्यांकनाकरिता नेमलेल्या समितीच्या मूल्यांकनावर पंधरा दिवसांत अंतिम निर्णय घेण्याचे आश्वासन सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे व पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी ११ आॅगस्ट रोजी दिले होते; तसेच तोपर्यंत टोलवसुली स्थगित ठेवावी, असे आवाहनही ‘आयआरबी’ला केले होते. ही मुदत बुधवारी संपल्यामुळे टोलवसुली पुन्हा सुरू होईल, या भीतीने सर्वपक्षीय कृती समितीने ठिय्या आंदोलन करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार सर्वपक्षीय कार्यकर्ते सकाळी अकरा वाजता शिरोली जकात नाक्याजवळ जमले होते. पालकमंत्र्यांचे आश्वासन जोपर्यंत टोलचा अंतिम निर्णय होत नाही तोपर्यंत आयआरबी कंपनीला टोलवसुली करू देणार नाही. तशी सूचना संबंधितांना दिली असल्याची माहिती पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आपणाशी फोनवर बोलताना दिली असल्याचे निवास साळोखे यांनी आपल्या भाषणात सांगितले. तोडगा काढण्यास कितीही अवधी लागला तरी टोलवसुली सुरू होणार नाही, असेही पालकमंत्र्यांनी सांगितल्याचे साळोखे म्हणाले. लवकरात लवकर तोडगा काढावा, अशी मागणीही साळोखे यांनी व्यक्त केली. जर लवकर तोडगा निघाला नाही आणि टोलवसुली पुन्हा सुरू झाली तर मात्र पुन्हा नव्याने संघर्ष उभा करावा लागेल, असा इशारा साळोखे यांनी दिला. महापालिकेवर भुर्दंड नको राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री एकनाथ शिंदे यांची आपण नुकतीच भेट घेतली असून, मूल्यांकनातील एक रुपयाचा बोजाही महापालिकेवर न टाकता सर्व रक्कम राज्य सरकारने भागवावी, अशी मागणी केल्याची माहिती आमदार राजेश क्षीरसागर यांनी यावेळी दिली. जर ‘आयआरबी’ने ५५० कोटींची किंमत मागितली असली तर ती आम्ही मान्य करणार नाही, सरकारने नेमलेल्या समितीचे मूल्यांकन आणि त्यावर होणारे व्याज द्यावे, अशी आमची भूमिका असल्याचे क्षीरसागर यांनी स्पष्ट केले. पुन्हा फसगत होऊ नये महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर चालढकल करून पुन्हा जनतेची फसवणूक होणार नाही, याची सरकारने खबरदारी घ्यावी, असे आवाहन नगरसेवक राजेश लाटकर यांनी केले. मागील सरकारच्या काळात आम्ही नगरसेवकांनी राजीनामे देण्याची तयारी केली; पण निर्णय घेण्याचे आश्वासन देऊनही टोल रद्द झाला नाही. त्यामुळे आताच्या सरकारने तातडीने निर्णय घेऊन टोल रद्द करावा, अशी मागणी लाटकर यांनी केली. यावेळी महापौर वैशाली डकरे, सभागृह नेता चंद्रकांत घाटगे, महेश जाधव, नामदेव गावडे, भगवान काटे, अशोक पोवार, अॅड. बाबा इंदुलकर, दिलीप देसाई, सुभाष जाधव, रामभाऊ चव्हाण, व्यंकाप्पा भोसले, अॅड. विवेक घाटगे, अॅड. प्रकाश मोरे, विजय कुलकर्णी, लालासाहेब गायकवाड, समीर नदाफ, बंकट थोडगे, बाबासाहेब भुयेकर, हंबीरराब मुळीक, वसंत मुळीक, श्रीकांत भोसले, आदींनी ठिय्या आंदोलनात भाग घेतला. (प्रतिनिधी)‘आयआरबी’चा बोका, दिसेल तिथे ठोका!कार्यकर्त्यांनी सुरुवातीस घोषणाबाजी केली, ‘आयआरबीचा बोका, दिसेल तिथे ठोका’यासह टोल आम्ही देणार नाही, या ‘आयआरबीचं करायचं काय; खाली डोकं, वर पाय’ अशा घोषणांनी परिसर पुन्हा एकदा दणाणून गेला. दिलीप देसाई हे राज्य सरकारविरोधात घोषणा द्यायला लागल्यानंतर कृती समितीचे निमंत्रक निवास साळोखे, रामभाऊ चव्हाण, सुरेश जरग, आदींनी त्यांना रोखले. आपले आंदोलन हे सरकारविरोधात नाही, तर ‘आयआरबी’विरोधात असून, ज्या काही घोषणा द्यायच्या त्या कंपनीच्या विरोधात द्या, अशी सूचना साळोखे यांनी केली.
टोल कायमचा रद्द करावा
By admin | Updated: August 27, 2015 00:52 IST