कोल्हापूर : माती, पाणी आणि आपल्या सभोवतालाशी बोला, नक्की चांगलंच लिहाल, अशा शब्दात ज्येष्ठ साहित्यिक आणि कादंबरीकार कृष्णात खोत यांनी शुक्रवारी विद्यार्थ्यांना आश्वासित केले.येथील शिवाजी मराठा हायस्कूलमध्ये सुरु असलेल्या दुसऱ्या बाल स्नेहसंमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी खोत बोलत होते. आपल्या भाषणात ते पुढे म्हणाले, निसर्गाशी जेव्हा आपण एकरूप होतो, तेव्हाच आपल्याला शब्द सुचतात आणि त्या शब्दातून कथा साकारते.या संमेलनाची इयत्ता दहावीत शिकणाऱ्या रेश्मा राठोड या विद्यार्थिनीने स्वागताध्यक्ष म्हणून आपल्या भाषणात फक्त रेकॉर्ड डान्सभोवती गुरफटलेल्या आणि गेल्या काही वर्षातील बदललेल्या हिडीस स्वरुपाच्या स्नेहसंमेलनावर आपले मत व्यक्त केले. या शाळेच्या बालस्नेहसंमेलनाचा आदर्श यावर्षी इतर शाळांनी घेतल्याचा आवर्जुन उल्लेखही तिने आपल्या भाषणात केला.
वारकऱ्यांच्या वेशात विद्यार्थ्यांची ग्रंथदिंडी
या संमेलनाला ग्रंथदिंडीने प्रारंभ झाला. वारकऱ्यांच्या वेशात आणि टाळ-मृदंगाच्या गजरात विद्यार्थ्यांनी शाळा परिसरातून ग्रंथ दिंडी काढली. ग्रंथदिंडीचे उद्घाटन शिक्षण निरीक्षक डी. एस. पोवार यांनी केले. यावेळी मेघराज खराडे, शिवतेज खराडे, मुख्याध्यापक प्रविण काटकर उपस्थित होते.गांधी फॉर टुमारो पथनाट्याने समारोपवर्धा येथील सर्वोदयी शाळेतील शिक्षकाने लिहिलेल्या गांधी फॉर टुमारो या पथनाट्याने या संमेलनाचा समारोप होत आहे. हे पथनाट्य संजय हळदीकर यांनी दिग्दर्शित केले आहे. तीन सत्रात पथनाट्यासह गीत गायन, पर्यावरणविषयक लघुपट आणि लोकनृत्यांचा समावेश आहे. निर्मला शितोळे या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत.