लोकमत न्यूज नेटवर्क
गडहिंग्लज : १४ वा वित्त आयोग व स्वत:च्या उत्पन्नातून जमा होणारा दिव्यांगांसाठीचा ५ टक्के निधी मार्चअखेर खर्च न केलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांनी १५ दिवसांत हा निधी दिव्यांगांच्या खात्यावर जमा करावा, अन्यथा त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रीय अपंग विकास महासंघातर्फे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे निवेदनातून करण्यात आली आहे.
महासंघाचे प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मंत्री मुश्रीफ यांना हे निवेदन दिले. या शिष्टमंडळात दत्तात्रय पन्हाळकर, अवधूत संकपाळ, शंकर चौगुले आदींचा समावेश होता.
या निवेदनात म्हटले आहे, राज्यातील काही महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, नगर पंचायत व ग्रामपंचायतींनी मार्च संपला तरीही दिव्यांगांच्या निधीचे वाटप केले नसल्याच्या तक्रारी महासंघाकडे आल्या आहेत. त्यामुळे राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना दिव्यांगांच्या निधी वाटपासंदर्भात तातडीने आदेश द्यावा आणि आदेशाचे पालन न करणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांवर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
----------------------------------------------
फोटो ओळी : गडहिंग्लज येथे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना बाळासाहेब पाटील यांनी निवेदन दिले. यावेळी दत्तात्रय पन्हाळकर, अवधूत संकपाळ, शंकर चौगुले उपस्थित होते.
क्रमांक : ०३०४२०२१-गड-०६