कोल्हापूर : दुय्यम निबंधक श्रेणीतील अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीची मागणी राज्य शासनाने मान्य केल्याने राज्यभरातील नोेंदणी व मुद्रांक विभागातील अराजपत्रित अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मंगळवारपासून सुरू झालेले कामबंद आंदोलन बुधवारी मागे घेण्यात आले. त्यामुळे आज गुरुवारपासून मुद्रांक कार्यालये पूर्ववत सुरू होणार आहेत. दोन दिवस दस्त नोंदणीचे काम ठप्प झाले होते.
या विभागात राज्यभरात तब्बल ५० टक्के पदे रिक्त आहेत. ही पदे शासन थेट नियुक्तीने भरणार असल्याने सध्या काम करत असलेल्या कर्मचाऱ्यांवर अन्याय होऊ शकतो. त्यामुळे अगोदर त्यांना पदोन्नती द्यावी व मगच नव्याने भरती करावी ही मुख्य मागणी होती. ती महसूलमंत्र्यांनी मान्य केल्याने संप मागे घेण्यात येत असल्याचे दुय्यम निबंधक श्रेणी एक अराजपत्रित अधिकारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष आर. एन. भानसे यांनी सांगितले. बंद आंदोलनाचे नेतृत्व एन. डी. गोंधळी, तानाजी नाईक, भिकाजी पाटील, ए. ए. राजहंस आदींनी केले. जिल्ह्यात मुद्रांक विभागाची १९ कार्यालये असून, ४५ हून अधिकारी व कर्मचारी काम करतात. दिवसाला सरासरी ३०० दस्त होतात व त्यातून सुमारे एक कोटी रुपयांची उलाढाल होते. संपात सहभागी न झालेल्या राजपत्रित अधिकाऱ्यांनी मुद्रांक नोंदणीची प्रक्रिया सुरू ठेवल्याने नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला. नेहमी गजबजणाऱ्या कार्यालयात चार ते पाच जणच काम करताना दिसत होते. कसबा बावडा येथील मुख्य प्रशासकीय इमारतीसह अन्य नाेंदणीच्या ठिकाणीदेखील अशीच परिस्थिती राहिली. मंगळवारी आंदोलनाचा पहिला दिवस असल्याने सर्वच कामकाज बंद असल्याचा समज झाल्याने कोणीही नोंदणीसाठी फिरकले नाहीत. आज कार्यालय पूर्ववत सुरू होणार असले तरी सध्या पितृ पंधरवडा असल्याने दस्त नोंदणी कमी प्रमाणात होऊ शकते.