कोपार्डे : रंगपंचमी खेळून झाल्यानंतर मित्रांबरोबर खाणीत अंघोळ करण्यासाठी गेलेल्या शालेय विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू झाला. यशराज राजू माळी(वय१६, रा. गणेशनगर, शिंगणापूर, ता. करवीर) असे मृत मुलाचे नाव आहे. ही घटना शुक्रवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास घडली. घटनेची नोंद करवीर पोलिसात झाली आहे.
अधिक माहिती अशी, यशराज आपल्या मित्रांसोबत सकाळपासून रंगपंचमी खेळत होता. प्रचंड उष्णता असल्याने दुपारी १२ नंतर मित्रांसोबत तो शिंगणापूर-चंबूखडी येथे मसोबाच्या मागच्या खाणीत आंघोळ करण्यासाठी गेला होता. त्याला पोहता येत नव्हते याची मित्रांनाही कल्पना नव्हती. काही मित्रांनी काठावरून पाण्यात उडी मारल्याने यशराज व मारुती कस्तुरे यांनीही पाण्यात उड्या मारल्या. या दोघांना पोहता येत नसल्याने पाण्यात गटांगळ्या खात असल्याचे अभिषेक खेतल या मित्राच्या लक्षात आले. त्याने पाण्यात उडी घेऊन मारुती कस्तुरे याला बाहेर काढले. पुन्हा पाण्यात उडी घेऊन यशराजला शोधण्याचा प्रयत्न अभिषेकने केला पण तो सापडला नाही. खाणीत असलेल्या गाळात तो अडकल्याने यशराजला पाण्यावरती येता आले नाही. यामुळे त्याचा गुदमरून मृत्यू झाला.
यशराज हा दहावीच्या वर्गात शिकत होता. त्याच्या वडील दोन वर्षापूर्वी मृत्यू झाला आहे. यशराजची आई योगिता या भाजीपाला विक्री करून कुटुंबाचा गाडा चालवत होत्या. यशराज हा एकुलता मुलगा होता. त्याला दोन विवाहित बहिणी आहेत. मूळचे सातारा जिल्ह्यातील असणारे माळी कुटुंब रोजगारानिमित्ताने शिंगणापूर येथे स्थायिक झाले आहे. यशराजचा बुडून मृत्यू झाल्याचे समजताच त्याची आई ,बहिणी, मामा, मामी यांनी ह्रदय पिळवटून टाकणारा हंबरडा फोडला.
फोटो १)यशराज माळी २)जेथे यशराजचा बुडून मृत्यू झाला तेथे जमलेली मोठी गर्दी