कोल्हापूर : वाढत्या कोरोना संसर्गामुळे जिल्ह्यात लागू करण्यात आलेला आठ दिवसांचा कडक लॉकडाऊन उद्या, सोमवार (दि. २४) पासून शिथिल करण्यात येणार आहे. पूर्वीप्रमाणे राज्य शासनाच्या नियमावलीनुसार १ जूनपर्यंत सकाळी ७ ते ११ या वेळेत भाजीपाला, किराणा अशा अत्यावश्यक सेवा सुरू राहतील. दिवसभर मात्र पूर्णत: लॉकडाऊन असेल. अटी, शर्तींनुसार जिल्ह्यातील व्यापार व उद्योगदेखील सुरू करता येणार आहे. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी शनिवारी रात्री याबाबतचे आदेश काढले.
जिल्ह्यात सध्या कोरोना संसर्गाचा उच्चांक असून बाधितांची संख्या दीड हजारावर तर रोजच्या मृत्यूचे प्रमाण सरासरी ५० ते ६० होते; त्यामुळे जिल्ह्यातील तीनही मंत्री, खासदार, आमदार, जिल्हा प्रशासनाच्या बैठकीत १५ ते २३ मे या कालावधीत कडक लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आज, रविवारी रात्री १२ वाजता या लॉकडाऊनचा कालावधी संपत आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी लॉकडाऊन शिथिल करीत असल्याचा आदेश काढला.
गेल्या आठ दिवसांत केवळ घरपोच दूध व भाजीविक्रीसाठी परवानगी देण्यात आली होती. किराणा मालाची दुकाने यांसह अत्यावश्यक सेवेत येणारे अन्य व्यवसायदेखील बंद ठेवण्यात आले होते. सध्या राज्यातदेखील लॉकडाऊन सुरू असून त्या नियमावलीनुसार सकाळी ७ ते ११ या वेळेत दूध, भाजीपाला, किराणा माल अशा अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. त्यानंतर मात्र कडकडीत बंद ठेवले जाते. हाच नियम सोमवारपासून कोल्हापूरसाठीदेखील लागू असेल. नागरिक या वेळेत जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी बाहेर पडू शकतील. राज्य शासनाने जाहीर केलेल्या लॉकडाऊनअंतर्गत जाहीर करण्यात आलेली नियमावली १ जून सकाळी सात वाजेपर्यंत लागू राहणार आहे.
---
उद्या उडणार झुंबड
गेले आठ दिवस कोल्हापूरकर घरात बंदिस्त असल्याने सोमवारी सकाळी मात्र शहरात लोकांची झुंबड उडणार आहे. सध्या लोकांना फक्त दूध मिळत आहे. लॉकडाऊनच्या काळात ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना शहरात येता येत नसल्याने लोकांना भाजीपाला मिळणे दुरापास्त झाले आहे. किराणा दुकानेदेखील बंद असल्याने संपलेल्या गरजेच्या वस्तू खरेदी करण्यासाठी बाजारपेठेत गर्दी होण्याची शक्यता आहे.
---
हे राहील सुरू
-वैद्यकीय क्षेत्राशी निगडित, अत्यावश्यक सेवा व संबंधित कार्यालये.
- सकाळी ७ ते ११ या वेळेत दूध, किराणा माल, बेकरी, फळे, खाद्यपदार्थांची दुकाने, मान्सूनपूर्व कामाच्या साहित्याची दुकाने, शेती व निगडित सर्व दुकाने, बाजार समित्या. याच साहित्याची सकाळी सात ते रात्री आठ घरपोच सेवा.
- कामगारांच्या राहण्याची सोय असलेले उद्योगधंदे
- विवाह समारंभ दोन तासांत व २५ माणसांच्या उपस्थितीत.
- शासकीय, सहकारी, खासगी बँका, विमा कार्यालये.
- रेल्वे, विमान, बस, रिक्षा अशी सार्वजनिक वाहतूक, नियम अटींनुसार खासगी वाहतूक.
- हाॅटेल, रस्त्यांवरील गाड्यांवरून केवळ पार्सल सेवा
- ---
हे राहील बंद
धार्मिक स्थळे, शाळा, महाविद्यालये, क्लासेस.
- सलून, स्पा, ब्यूटी पार्लर
- मनोरंजन पार्क, चित्रपटगृह, जलतरण तलाव, व्यायामशाळा, क्रीडासंकुले, बगीचे, चित्रीकरण.