लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : ‘गोकुळ’ दूध संघाने मुंबईत कोट्यवधींची जागा खरेदीचा निर्णय घेतला आहे. पण प्रकल्पाबाबत विश्लेषण होणे गरजेचे आहे, तसे न करता जागा खरेदी केली तर सत्ताधारी तोंडावर पडतील, असा इशारा ‘गोकुळ’चे संचालक चेतन नरके यांनी दिला. शौमिका महाडिक यांनी व्यक्त केलेले मत हे त्यांचे स्वत:चे आहे, मात्र त्यांचे आरोप योग्यच असल्याचेही त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
‘गोकुळ’च्या कारभाराबाबत शौमिका महाडिक एकट्याच बोलत असल्याबाबत विचारले असता, चेतन नरके म्हणाले, शौमिका महाडिक यांनी घेतलेली भूमिका वैयक्तिक होती, पॅनलची नाही. माझे वडील अरुण नरके हे ४६ वर्षे महादेवराव महाडिक यांच्यासोबत राहिले, त्यामुळे चार महिन्यांत बाजूला जाण्याचा प्रश्नच येत नाही. सर्वच नेत्यांना ‘गोकुळ’ वाढवायचे आहे, मात्र ते कोणत्या पध्दतीने पुढे गेले पाहिजे, या विचारात फरक आहे. मुंबईतील जागेबाबत शौमिका महाडिक यांनी मांडलेला मुद्दा योग्य आहे. प्रत्येक गोष्टीचे विश्लेषण होणे गरजेचे असते. मात्र, दुर्देवाने संचालक मंडळात कोणाचेही ऐकून घेतले जात नाही. सगळेच अजूनही निवडणुकीच्या मूडमध्ये आहेत. त्यामुळेच जागा खरेदीचा घाईत घेतलेला निर्णय अडचणीचा ठरु शकतो.
नेत्यांच्या कानावरच आक्षेप घालतो
संघाच्या अध्यक्षांकडे काही सूचना, आक्षेप नोंदवले तर त्याची दखल घेत नाहीत. त्यामुळे संघाचे नेते मंत्री सतेज पाटील व मंत्री हसन मुश्रीफ यांच्या कानावरच घालत असतो, असे नरके यांनी सांगितले.
आकसापोटी खाते उघडण्यास विरोध
‘गोकुळ’चा एक रुपयाही आता युथ बँकेत नाही. शहरातील २७५ दूध वितरक व ‘गोकुळ’चे कर्मचारी बँकेत पुन्हा खाती उघडण्यास तयार आहेत. मात्र, आपण दुसऱ्या पॅनलमधून निवडून आल्याने अध्यक्ष आकसापोटी विरोध करत आहेत. नेते तयार आहेत, मात्र अध्यक्षांच्या मनातील राग गेला नसल्याचे चेतन नरके यांनी सांगितले.