कोल्हापूर : स्मार्ट सिटीसाठी केंद्र शासनाने सुचविलेल्या दहा विषयांवर नागरिक ांच्या अपेक्षा जाणून घेण्याचा प्रयत्न महापालिकेतर्फे आज, मंगळवारपासून केला जाणार आहे. महापालिकेच्या गांधी मैदान, ताराराणी कार्यालय, शिवाजी मार्केट व राजारामपुरी विभागीय कार्यालयात सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत नागरिकांच्या सूचना स्वीकारल्या जाणार आहेत. नागरिकांनी लेखी स्वरूपात सूचना द्यावात, जेणेकरून गरजेच्या अग्रक्रमानुसार निधीबाबत शासनाकडे तक्ता पाठविणे सोपे जाईल, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे. याव्यतिरिक्त २० जुलैपर्यंत नागरिकांना लेखी स्वरूपात सूचना देण्याची मुभा उपलब्ध असणार आहे. देशातील १००, तर राज्यातील दहा शहरांचा स्मार्ट सिटीमध्ये समावेश होणार आहे. ३६ महापालिका व आठ ‘अ’ वर्ग नगरपालिका असणारी अशी एकूण ४४ शहरे या स्पर्धेत आहेत. महापालिका प्रशासन, लोकसहभाग, ई-गव्हर्नन्स, वीज, पाणीपुरवठा व बचत, पर्यटन व प्रदूषण मुक्तीबाबत धोरण, आदी मुद्द्यांना अनुसरून गुणानुक्रमे अव्वल दहा ठरणाऱ्या शहरांचा या योजनेत समावेश होणार आहे. राज्यस्तरानंतर केंद्रीय स्तरावर स्पर्धा होऊन यामध्ये अग्रक्रमाने अव्वल ठरणाऱ्या शहरांत सर्वांत प्रथम योजना सुरू केली जाणार आहे. केंद्र व राज्याकडून १५० कोटी, तर मनपाच्या स्वनिधीतून ५० कोटी, असा २०० कोटी रुपयांचा निधी प्रतिवर्षी, असा पाच वर्षांसाठी उपलब्ध होणार आहे.
‘स्मार्ट सिटी’ची लगीनघाई
By admin | Updated: July 7, 2015 01:06 IST