धैर्यशीलकडून शेट्टींचा त्रिफळा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2019 01:22 AM2019-05-24T01:22:43+5:302019-05-24T01:22:48+5:30

कोल्हापूर : संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या हातकणंगले लोकसभा ...

Shetty's triple stroke! | धैर्यशीलकडून शेट्टींचा त्रिफळा !

धैर्यशीलकडून शेट्टींचा त्रिफळा !

Next

कोल्हापूर : संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या हातकणंगले लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे धैर्यशील माने हे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांचा ९६ हजार ३९च्या मताधिक्याने पराभव करीत ‘जायंट किलर’ ठरले. देशातील शेतकऱ्यांचे नेते म्हणून एकीकडे शेट्टी यांची प्रतिमा ठळक होत असताना माने यांच्यासारख्या युवा नेत्याने त्यांची लोकसभेतील हॅट्ट्रिक रोखली.
माने यांच्या विजयात ‘इचलकरंजी’चा वाटा मोठा असला तरी ‘पन्हाळा-शाहूवाडी’ व ‘हातकणंगले’ विधानसभा मतदारसंघांची साथही मोलाची ठरली. वंचित बहुजन आघाडीचे सय्यद अन्वर यांनी अपेक्षेप्रमाणे १ लाख २३ हजार मते घेतली. नावाचे साम्य असलेले मुंबईचे राजू शेट्टी यांच्यासह १४ जणांची डिपॉझिट जप्त झाली.
तब्बल पंधरा तास मतमोजणीची प्रक्रिया सुरू होती. निवडणूक अधिकारी नंदकुमार काटकर यांनी रात्री ११ वाजता अधिकृत निकालाची घोषणा केली. माने यांना विजयी प्रमाणपत्र देऊन काटकर यांनी त्यांचे अभिनंदन केले.
हातकणंगले मतदारसंघात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी, शिवसेनेचे धैर्यशील माने यांच्यात सरळ सामना झाला. येथे शेट्टी, माने यांच्यासह तब्बल १७ उमेदवार रिंगणात होते. वंचित बहुजन आघाडीचे सय्यद अन्वर यांनीही शेवटपर्यंत मतदारसंघात हवा राखली. २३ एप्रिल रोजी ७०.२८ टक्के मतदान झाले, त्याची मतमोजणी गुरुवारी राजाराम तलावाशेजारील शासकीय गोदामात पार पडली. सकाळी सात वाजता २० टेबलांवर प्रक्रिया सुरू झाली. साधारणत: तासाभरात पोस्टलची मोजणी पूर्ण होऊन प्रत्यक्ष इव्हीएमच्या मोजणी सुरू झाली. पोस्टल मतांमध्येच राजू शेट्टी व धैर्यशील माने यांच्यात चढाओढ सुरू झाल्याने कार्यकर्त्यांची घालमेल सुरू झाली. पहिल्या फेरीत शेट्टी यांनी १०४ ची नाममात्र आघाडी घेत आगेकूच सुरू केली. पण दुसºया फेरीत धैर्यशील माने यांनी ३०९३ चे मताधिक्य घेत आपली दिशा स्पष्ट केली. त्यानंतरच्या प्रत्येक फेरीत माने यांच्या मताधिक्यात वाढच होत गेली. नवव्या फेरीत हे मताधिक्य ७० हजार ९०० पर्यंत पोहोचले; पण दहाव्या फेरीत त्यात घट होत ६७ हजार ८१६ पर्यंत खाली आले. त्यामुळे शेट्टी यांच्या कार्यकर्त्यांच्या आशा पल्लवित झाल्या. पण हा आनंद फार काळ टिकला नाही. अकराव्या फेरीपासून माने यांनी मुसंडी मारली, १५ व्या फेरीअखेर ८८ हजार ५३४ चे मताधिक्य राखले. हे मताधिक्य ३५ हजारांच्या वर गेल्यानंतर समर्थकांनी एकच जल्लोष सुरू केला.

‘वारणा’चे पाणी पेटले!
इचलकरंजीतील पाणीप्रश्नावरच ‘हातकणंगले’ची निवडणूक टर्न झाली. इचलकरंजीतून मानेंना ३०-४० हजारांचे मताधिक्य मिळेल असे सुरुवातीपासूनच वातावरण होते. पण प्रत्यक्षात तब्बल ७६ हजारांचे मताधिक्य इचलकरंजीतून मिळाले. त्यापाठोपाठ हातकणंगलेने ४४ हजार ७४७, तर पन्हाळा-शाहूवाडीने २१ हजार ५५२ मताधिक्य दिले.
शिराळा, इस्लामपूर शेट्टींच्या पाठीशी
शिराळा, इस्लामपूर व शिरोळ विधानसभा मतदारसंघांत राजू शेट्टींना चांगले मताधिक्य मिळाले. त्यांचा बालेकिल्ला असलेल्या शिरोळमध्ये त्यांना अवघे साडेसहा हजारांचे मताधिक्य मिळाले. त्या तुलनेत शिराळा व इस्लामपूरने अनुक्रमे १७ व १६ हजारांचे मताधिक्य देत शेट्टींना साथ दिली.
‘९६’ हजारांचेच मताधिक्य हवे
धैर्यशील माने एक लाखाच्या मताधिक्याकडे आगेकूच करत असताना कार्यकर्त्यांत उत्साह संचारला. आम्हाला एक लाखाचे मताधिक्य नको, ‘९६’ हजारांचेच हवे.
२००९ ला राजू शेट्टी यांनी निवेदिता माने यांचा ९५ हजार ६० मतांच्या फरकाने पराभव केला होता. त्याची
परतफेड केलीच पण ‘९६’ कुळी म्हणून आम्हाला
९६ हजारांचेच मताधिक्य हवे, असे कार्यकर्ते सांगत होते.
शाहूवाडीतील
मतदान यंत्रात बिघाड
शाहूवाडीतील एका मशीनची मोजणी करताना तांत्रिक बिघाड झाल्याने मोजणी थांबली. पण नंतर व्हीव्हीपॅटच्या माध्यमातून पडताळणी केली.
टपालाची सहा मते बाद
टपालाची मोजणी सुरू केल्यानंतर पहिली सहा मते बाद ठरवण्यात आली. संबंधित मतपत्रिकेसह अर्जावर सक्षम अधिकाऱ्यांची स्वाक्षरी नसल्याने ही मते बाद ठरवली.
व्हीव्हीपॅटकडे
प्रतिनिधींचे दुर्लक्ष
दुपारी साडेचारपर्यंत बहुतांश केंद्रांची मोजणी प्रक्रिया पूर्ण होत आली होती. तत्पूर्वीच व्हीव्हीपॅटची मोजणी सुरू केली; पण दोन्ही प्रमुख उमेदवारांच्या मताधिक्यात मोठा फरक असल्याने कार्यकर्त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले.
टपाली मतदानात
धैर्यशील मानेच पुढे
पहिल्या फेरीचा अपवादवगळता पोस्टलसह सर्वच फेºयांत धैर्यशील माने यांनी आघाडी राखली. सैनिकी मतांतही माने यांनाच पसंती दिल्याचे मोजणीत स्पष्ट झाले. एकूण ८०५७ पोस्टल मते होती, यामध्ये कर्मचाºयांची ५४०६, सैनिकांची २१५१ मते होती. त्यातील ५८९० मते वैध ठरली असून धैर्यशील माने यांना ३ हजार, शेट्टी यांना २४६१ व अस्लम सय्यद यांना ४६८ मते मिळाली.
दहा वर्षांनंी गुलाल
निवेदिता माने यांचा २००९ ला राजू शेट्टी यांनी मोठ्या फरकाने पराभव केला होता. त्यानंतर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत ही धैर्यशील यांच्या पत्नी वेदांतिका यांचा रुकडीमधून पराभव झाला होता. तब्बल १० वर्षांनंतर माने यांच्या घराला गुलाल लागला.
‘हातकणंगले’कडे
नेत्यांची पाठ
सगळ्यांच्या नजरा ‘कोल्हापूर’च्या निकालाकडेच लागल्या होत्या. त्यामुळे ‘हातकणंगले’च्या मोजणी स्थळी दुसºया फळीतील कार्यकर्ते होते. शिवसेनेकडून जिल्हा परिषदेचे सदस्य राजवर्धन निंबाळकर, बबलू मकानदार, रवींद्र माने, तर ‘स्वाभिमानी’कडून जिल्हाध्यक्ष भगवान काटे, मदन कारंडे, आदी कार्यकर्ते होते.
वडगाव, दानोळी
माने यांच्या पाठीशी
पेठवडगावमध्ये ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सभा घेऊन माने घराण्यावर टीका केली होती. त्यात स्थानिक गटही शेट्टी यांच्या पाठीशी ताकदीने राहिल्याने येथे शेट्टी आघाडी घेतील, असा अंदाज होता. पण वडगावमध्ये माने यांना सुमारे पाच हजारांचे मताधिक्य मिळाले; तर दानोळी (ता. शिरोळ) येथे पाणीप्रश्नावरून माने बॅकफूटवर जातील असे वाटत असतानाच परिसरातील आठ गावांनी त्यांना चांगली साथ दिल्याचे मतदानावरून दिसते.

Web Title: Shetty's triple stroke!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.