कोल्हापूर : शासनाच्या धोरणांविरोधात २ सप्टेंबर रोजी देशव्यापी संपात कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ व जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ सहभागी होत आहे. या दिवशी जिल्ह्यातील सर्व प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा, उच्च माध्यमिक शाळा व महाविद्यालये बंद ठेवून हा संघ या संपात सहभागी होत असल्याची माहिती शैक्षणिक व्यासपीठाचे सभाध्यक्ष एस. डी. लाड यांनी पत्रकार परिषदेत दिली. लाड म्हणाले, ‘शिक्षण वाचवा - महाराष्ट्र वाचवा’ असा आमचा नारा आहे. महाराष्ट्र, शिक्षण व सामाजिक क्षेत्रांत अलीकडे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. याबद्दल अनेक वेळा प्रयत्न करूनही शासनाने योग्य तो निर्णय घेतलेला नाही. कायम अनुदानित शाळांना शासनाने पाठबळ दिले आहे, तर विनाअनुदानित शाळा बंद करण्याच्या शासनाच्या धोरणाला विरोध आहे. त्यामुळे गरिबांना मिळणारे शिक्षण संपविण्याचे धोरण सरकारचे असल्याचा आरोपही केला. शिक्षण विभागाचे महसुलीकरण रद्द करून शिक्षण विभागाचे अस्तित्व पूर्वीप्रमाणे चालू ठेवावे. शिक्षक व शिक्षकेतर सेवक भरतीवरील बंदी उठवावी, संस्थेचे शिक्षकभरतीचे अधिकार काढून घेणारा शासन निर्णय तातडीने रद्द करावा, कायम विनाअनुदानित तत्त्वावरील सर्व प्रकारच्या शाळांना व महाविद्यालयांना विनाअट अनुदान द्यावे, आदी मागण्यांसाठी हे आंदोलन उभारले जात आहे. या आंदोलनातून मागण्या मान्य झाल्या नाहीत तर पुन्हा तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. कोल्हापूर शहर व करवीर तालुक्यातील सर्व संस्थाचालक, प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी बुधवार, दि. २ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता येथील संग्राम उद्यान (टाउन हॉल) येथे जमावे. तसेच प्रत्येक तालुक्यातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी त्या-त्या तालुक्याच्या ठिकाणी जमावे, असेही आवाहन केले आहे. या पत्रकार परिषदेस जिल्हा संस्थाचालक संघाचे अध्यक्ष वसंतराव देशमुख, के. बी. पोवार, डी. बी. पाटील, भरत रसाळे, प्रा. एस. बी. उमाटे, प्रभाकर आरडे, पी. के. पाटील, सी. आर. गोडसे, एस. एन. माळकर, सी, एस. हेरवाडे, आर. डी. पाटील, आर. वाय. पाटील, पी. एस. देशमुख, के. बी. पोवार, एस. के. पाटील, जयंत आसगावकर, आदी उपस्थित होते. कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर बुधवारी (दि.२) होत असलेल्या देशव्यापी संपाला पाठिंबा देऊन त्यांच्या खांद्याला खांदा लावून सहभागी व्हा, असे आवाहन माध्यमिक शिक्षक संघटनेचे नेते राम पाटील यांनी शुक्रवारी येथे केले. राजर्षी शाहू स्मारक भवन येथे कोल्हापूर जिल्हा सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित केली होती. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संघटनेचे अध्यक्ष आर. के. जाधव होते. राम पाटील म्हणाले, कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर होत असलेला संप हा वेतनासाठी नाही आहे. सरकार कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर बोलायला तयार नाही. किमान वेतनाचा प्रश्नाही ऐरणीवर आहे. त्यासाठी हा संप पुकारला आहे. आपला जरी थेट या संपाशी संबंध नसला तरी निवृत्त कर्मचारी या नात्याने आंदोलकांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येकाने सहभागी व्हावे. त्यांना पाठिंबा देऊन त्यांचे मनोबल वाढवावे. डॉ. मानसिंगराव जगताप यांनी मध्यवर्ती बसस्थानक परिसरात संघटनेच्या कार्यालयाकरिता इमारतीसाठी प्रयत्न करावेत असे सांगितले. संघटनेने सेवानिवृत्तांच्या प्रश्नांची नोंद घ्यावी, असेही त्यांनी आवाहन केले. एस. टी. खाडे म्हणाले, संघटनेचे काम चांगले असून, ते कौतुकास्पद आहे. सेवानिवृत्त कर्मचारी व ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या एकच आहेत. त्या दृष्टीनेही प्रयत्न करावेत. सुलोचना श्रीधर यांनी संघटनेच्या माध्यमातून सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी एकजूट कायम ठेवावी, असे आवाहन केले. माणिकराव इंदूलकर यांच्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली. संघटनेचे अध्यक्ष आर. के. जाधव यांनी स्वागत केले. उपाध्यक्ष एम. व्ही. कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. एम. व्ही. देसाई यांनी आभार मानले. यावेळी डॉ. आप्पासाहेब जिरगे, शंकर गिरीगोसावी, संघटनेचे उपाध्यक्ष माधव कुलकर्णी, बाजीराव निकम, एल. डी. देसाई, नामदेव जाधव, ंिंहदुराव पाटील, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
जिल्ह्यातील शाळा बुधवारी बंद
By admin | Updated: August 30, 2015 00:37 IST