लोकमत न्यूज नेटवर्क
काेल्हापूर : रेमडेसिविर इंजेक्शन नसल्याने रुग्ण तडफडत असताना केंद्र सरकारने बघ्याची भूमिका घेऊ नये. मी केंद्र सरकारपुढे साष्टांग नमस्कार घालतो; पण रेमडेसिविर द्यावे, अशी विनंती ग्रामविकास व कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केली. केंद्र सरकारचे नियंत्रण असताना अशा प्रकारे रेमडेसिविर इंजेक्शन भाजप नेत्यांना मिळतात कशी, असा सवालही त्यांनी यावेळी केला.
अहमदनगर येथे खासदार सुजय विखे-पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांचे पत्र घेऊन हिमाचल प्रदेश येथून रेमडेसिविर इंजेक्शन आणून त्याचे वाटप स्वत:च केले. मला कळत नाही, भाजपच्या नेत्यांनाच ही इंजेक्शन कशी मिळतात? केंद्र सरकारचे नियंत्रण असताना अशा प्रकारे इंजेक्शन मिळतात कशी? महाराष्ट्राला इंजेक्शन मिळत नसल्याने राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे हे मदतीसाठी केंद्राच्या पाया पडतो, अशी विनंती करतात. त्यापुढे जाऊन आपण केंद्र सरकारपुढे साष्टांग नमस्कार घालतो; पण इंजेक्शन द्यावीत, असे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.
----------------------------------------------------
मृत्यूचे वाढते प्रमाण चिंताजनक
कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाबाधितांचे मृत्यूचे प्रमाण वाढत आहे, हे चिंताजनक आहे. खासगी दवाखाने व सीपीआरमध्ये हे प्रमाण अधिक असून डॉक्टरांनी शेवटच्या टाेकाला जाऊन रुग्णांचा जीव वाचवण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन मंत्री मुश्रीफ यांनी केले.