भारतीय सैन्य भरती आणि पोलीस भरती गेली तीन वर्षे झाली नाही, तर दुसरीकडे मुलांची वयोमर्यादा ओलांडून जात आहे. त्यामुळे सैन्य किंवा पोलीस भरतीसाठी तयारी करणाऱ्या मुलांना वयोमर्यादेत सवलत देण्याची मागणी अभिषेक डोंगळे युवा शक्तीच्यावतीने राधानगरीचे नायब तहसीलदार संदीप गुडाळे यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे.
कोरोना महामारीमुळे पोलीस व सैन्यदलात भरती न झाल्याने अनेक तरुण मुले-मुली भरतीमध्ये सहभागी होऊ शकले नाहीत. अशी हजारो मुले सध्या मोठ्याप्रमाणात सराव करत आहेत. त्यांचे देशसेवेचे स्वप्न अपूर्णच राहते की काय, अशी परिस्थिती सध्या आहे. काहीजण वयोमर्यादेमुळे भरती प्रक्रियेतून बाहेर जाऊ लागले आहेत. याबाबत भरती प्रक्रिया घोषित केल्यानुसार ती १ डिसेंबरला घ्यावी, वयाच्या अटीमध्ये सवलत मिळावी, याकरिता शासनदरबारी दखल घेऊन लवकरात लवकर भरती घेण्यात यावी, अशी मागणी केली आहे.