कोल्हापूरकरांचे जीवनमान उंचावणार

By admin | Published: February 11, 2015 11:43 PM2015-02-11T23:43:08+5:302015-02-12T00:26:33+5:30

नूतन आयुक्त पी. शिवशंकर यांची भूमिका-- थेट संवाद

Raising the life of Kolhapur | कोल्हापूरकरांचे जीवनमान उंचावणार

कोल्हापूरकरांचे जीवनमान उंचावणार

Next

शहरवासीयांना महापालिकेतर्फे देण्यात येत असलेल्या सर्व प्रकारच्या सेवांचा दर्जा वाढविण्यावर भर राहील. ई-गव्हर्नन्स, ई-आॅफिस व ई-लोकशाही यासारखे अभिनव प्रयोग करून प्रशासन अधिक गतिमान व पारदर्शक क रू. महापालिकेच्या प्रत्येक कामाचे उत्तरदायित्व ठरविण्यात येईल. कॉँक्रीटचे रस्ते व वॉटर, तसेच प्रॉपर्टी आॅडिट करून शहरवासीयांचे जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न करणार आहे. माझ्या प्रामाणिक प्रयत्नांना कोल्हापूरचे नागरिक नक्की सहकार्य करतील, अशी अपेक्षा महापालिकेचे नूतन आयुक्त पी. शिवशंकर यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये व्यक्त केली.

प्रश्न : शहरासाठी कोणत्या अभिनव योजना आखल्या आहेत?
उत्तर : महापालिका व शहराबाबत ठोस माहिती घेतली आहे. नागरिकांना सहज व पारदर्शक सेवा-सुविधा देण्याबाबत आग्रही आहे. सर्व मिळकतींचे आॅडिट करणार आहे. करदात्यांकडून वसुली, चांगल्या सुविधा देणे आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानासह कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढविणे हे विषय सध्या पटलावर आहेत. पोलीस प्रशासनाच्या मदतीने पार्किंग स्पॉट ठरवून त्यांचा लवकरच अंमल करण्यात येईल. वाहतुकीचा प्रश्न सोडविण्यावर आमचा भर आहे. बंदिस्त पार्किंग खुली करण्यात येतील. डांबरी रस्त्यांऐवजी कॉँक्रीटचे रस्ते करण्यात येतील. त्यामुळे किमान वीस वर्षे रस्ते टिकतील. रस्त्याखालील पाईपलाईनची स्थिती पाहून प्रसंगी पाईप्स बदलून कॉँक्रीटचे रस्ते केले जातील. या सर्व प्रयत्नांचे दृश्य परिणाम येत्या सहा महिन्यांत दिसतील.
प्रश्न : गेल्या चार वर्षांत ७०० कोटींचे प्रकल्प रखडले आहेत. त्याचे काय?
उत्तर : एसटीपी, नगरोत्थान योजना, थेट पाईपलाईन, रंकाळा व कळंबा तलाव संवर्धन, आदी सर्व योजनांची माहिती घेतली आहे. संबंधित अधिकारी व ठेकेदार यांची बैठक घेतली आहे. महापालिका प्रशासन व ठेकेदार यांच्यापैकी नेमक्या कोणाकडून प्रकल्प रखडत आहेत, याचा अभ्यास केला आहे. ठेकेदारांना प्रत्येक कामासाठी विहित वेळ ठरवून दिला आहे. पाईपलाईन साठी वन्यजीवसह सर्व मंजुरी लवकरच मिळतील. निविदेतील ठरलेल्या वेळेप्रमाणे योजना पूर्ण होण्याकडे कटाक्ष राहील. नगरोत्थान योजनेतील कामचुकार ठेकेदारांना दर आठ दिवसांत समक्ष येऊन कामाच्या प्रगतीचा अहवाल देण्याच्या सूचना केल्या आहेत. रखडलेले प्रकल्प हे चित्र लवकरच बदललेले दिसेल.
प्रश्न : प्रशासन गतिमान व पारदर्शक करण्यासाठी नेमके काय करणार?
उत्तर : ई-लोकशाही, ई-गव्हर्नन्स व ई-आॅफिस यांसारख्या माध्यमातून लोकांना सोबत घेऊन जलद व पारदर्शकपणे प्रशासन काम करेल. ई-लोकशाही या प्रणालीद्वारे टोल फ्री क्रमांकावर फोन किंवा एसएमएसद्वारे लोकांना तक्रार नोंदविता येईल. वेळेत तक्रारीचे निवारण करणे बंधनकारक राहील. समस्येचे निराकरण व स्टेटस यांचीही वेळोवेळी माहिती संबंधित तक्रारदारांसह मला समजणार आहे. ई-आॅफिस ही एक खिडकी योजनेचा पुढील अत्याधुनिक टप्पा असेल. ठरलेल्या वेळेत नागरिकांची कामे होतील, अशा प्रकारच्या प्रणालीचा वापर करणारी कोल्हापूर महापालिका राज्यात एकमेव असेल. यासाठी कर्मचाऱ्यांना आवश्यक प्रशिक्षण देऊ. बायोमेट्रिक हजेरीद्वारे कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या हजेरीवर लक्ष ठेवले जाईल. ठरावीक वेळेत कार्यालयात उपस्थित राहणे बंधनकारक केले आहे. प्रत्येक विभागात सीसीटीव्ही कॅमेरे बसवून त्याची लिंक थेट आयुक्त कार्यालयात जोडणार आहे.
प्रश्न : रंकाळ्यासह पर्यटनास उत्तेजन देण्याबाबत उपाय योजणार आहात काय ?
उत्तर : रंकाळ्यासाठीचा तयार करण्यात येत असलेला डीपीआर हा फक्त मजबुतीकरणासाठी नाही. हैदराबाद येथील हुसेनसागर लेक व लुंबती गार्डनच्या धर्तीवर रंकाळ्याचा विकास करणार आहे. प्रशस्त गार्डन व लेझर शो हे आकर्षण असेल. अंबाबाई दर्शनासह इतर कोणत्याही कारणासाठी येणारा प्रत्येक पर्यटक रंकाळ्याला भेट देईलच. कोल्हापूरच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या या प्रोजेक्टवर काम सुरू केले आहे. रंकाळ्याच्या पाण्याचा बायोलॉजिकल सर्व्हे करून प्रश्न कायमचा निकाली काढला जाईल.
प्रश्न : शाळा, आरोग्य, पाणीपुरवठा, कचरा, आदी समस्या कशा पद्धतीने हाताळणार?
उत्तर : शहरातील शाळांना भेटी देऊन त्यानंतर ठोस निर्णय घेऊ. पाणीगळती, वापर व उपसा यांचे गणित मांडण्यासाठी लवकरच वॉटर आॅडिट करण्यात येईल. पाण्याचे असमतोल वाटप होणार नाही. कचऱ्यासाठीची टाकाळा लॅँडफिल्ड साईड दोन महिन्यांत तयार होईल. कचऱ्याबाबत तक्रारी आल्यास आरोग्य निरीक्षकांना जबाबदार धरण्यात येईल. महापालिकेच्या दवाखान्यांना भेट देऊन नेमकी समस्या समजून तत्काळ निराकरण केले जाईल. शहरवासीयांचे आरोग्यमान उंचावण्यासाठी महापालिकेची आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यावर भर राहील.
प्रश्न : शहरवासीयांना कोणते आवाहन कराल?
उत्तर : शहरात आमूलाग्र बदल करण्याच्या अनेक योजना आहेत. त्या राबविताना, उद्याच्या सुंदर कोल्हापूरसाठी थोडा त्रास झाला तरी सहन करा. महापालिकेचे कर वेळेत भरून उत्पन्नवाढीस हातभार लावा, जेणेकरून विकासकामांवर परिणाम होणार नाही.
- संतोष पाटील

Web Title: Raising the life of Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.