कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात दमदार पाऊस सुरू असल्याने नद्यांच्या पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. पंचगंगेची पातळी २५ फुटांवर गेली असून, पाणी पात्राबाहेर सरकले आहे. राधानगरी, वारणा धरण ४१ टक्के भरले असून, जिल्ह्यातील १४ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. कोदे धरण आज, बुधवारी १०० टक्के भरले. गगनबावडा, भुदरगड, शाहूवाडी तालुक्यांतील दहा मार्गांवरील वाहतूक अंशत: बंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी ३७.६० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. काल, मंगळवारी रात्रभर धुवाधार पाऊस सुरू होता. आज सकाळपासून पावसाचा जोर काहीसा कमी झाला असला तरी जेवढा उघडीप देईल, तेवढ्या जोराचा पाऊस येत होता. धरण क्षेत्रात अतिवृष्टी झाली असून, धरणांच्या पातळीत वाढ होऊ लागली आहे. राधानगरी, वारणा, कासारी, कुंभी, पाटगाव ही धरणे ४० टक्क्यांपेक्षा अधिक भरली आहेत. कडवी धरण ५४ टक्के भरले असून, घटप्रभा पाठोपाठ कोदे धरणही पूर्ण क्षमतेने भरले आहे. घटप्रभामधून प्रतिसेकंद ९२४, तर कोदे धरणातून १०० घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू आहे. नद्यांच्या पातळीत वाढ होत असून, पंचगंगा नदीवरील सात, भोगावती नदीवरील दोन, तर कासारी नदीवरील पाच, असे १४ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. शिंगणापूर बंधाऱ्यावर चार, कोगे बंधाऱ्यावर साडेपाच, अंदूर बंधाऱ्यावर तीन, राजाराम बंधाऱ्यावर आठ, बहिरेश्वर बंधाऱ्यावर तीन फूट पाणी आहे. पुराच्या पाण्यामुळे सहा मार्गांवरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे. पंचगंगेचे पाणी पात्राबाहेर पडले असून, काठावरील शेतवडीत घुसू लागले आहे. आज सकाळी आठ वाजता संपलेल्या २४ तासांत गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक १२३ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. चंदगड मध्ये ५८, शाहूवाडीत ५९.५०, राधानगरीत ४५ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. आजऱ्यात ठिकठिकाणी वृक्ष कोसळलेआजरा : आजरा शहर व परिसरात जोरदार वाऱ्यासह तुफानी पावसाने नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. यामध्ये ठिकठिकाणचे वृक्ष कोसळले, तर दिवसभर वारंवार वीजपुरवठा खंडित होत होता.काल, मंगळवारी रात्रीपासून पावसाचा जोर वाढला असून, रात्रभर जोरदार वाऱ्यासह पाऊस सुरू आहे. आजरा-आंबोली मार्गावर रस्त्या शेजारील वृक्ष रस्त्यात कोसळल्याने तासभर वाहतूक ठप्प झाली होती. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कर्मचाऱ्यांनी सदर वृक्ष हलवला.पावसामुळे रोपलावणीमध्ये बळिराजा गुंतला आहे. हिरण्यकेशी नदीच्या पाण्यामध्ये वाढ होत असून, तालुक्यातील बंधारे पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. वृक्षांच्या ठिकठिकाणी झालेल्या पडझडीमुळे दिवसभर वारंवार वीजपुरवठा व वाहतूक खंडित झाली. राधानगरी : ओढे-नाले भरलेशिरगाव : राधानगरी तालुक्यात पडत असलेल्या धुवाधार पावसाने ओढे-नाले भरून वाहू लागले आहेत. शेतामध्ये सगळीकडे पाणीच पाणी साचू लागल्याने भात रोप लावणीच्या कामास वेग आला आहे. तालुक्यात गेले तीन-चार दिवस पावसाने हजेरी लावली आहे. या पावसामुळे बळिराजा सुखावला आहे. महिनाभर खोळंबत पडलेली भात लावणीची कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. काही ठिकाणी भातामध्ये चिखल कोळपा घालण्याची कामे सुरू आहेत, तर डोंगररानामध्ये नाचणा मांडणीसाठी शेतकरी वर्ग लगबग करीत असल्याचे चित्र सर्वच भागात दिसत आहे.शेळोशी खोऱ्यातील वाहतूक ठप्पसाळवण : गगनबावडा तालुक्यात जोरदार पाऊस सुरू असून गेल्या २४ तासांत गगनबावडा येथे १०० मि.मी. पावसाची नोंद झाली. तालुक्यात आतापर्यंत २६८९ मि.मी. पाऊस पडला. जोरदार पावसामुळे तालुक्यात भातरोप लावणीच्या कामाला गती आली आहे. वादळी वाऱ्यामुळे आडसाली ऊस पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. कोदे धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे आज, बुधवारी पहाटे कोदे तलाव पूर्ण क्षमतेने भरला असून, सांडव्यावरून पाणी वाहू लागले आहे. कुंभी तलाव केवळ ४३ टक्के भरला आहे. वेसरफ तलाव ९५ टक्के भरला आहे. दरम्यान, अणदूर धरणावर पाणी आल्यामुळे या मार्गावरून होणारी शेळोशी खोऱ्यातील वाहतूक ठप्प झाली आहे. पावसाचा जोर वाढला, तर वेतवडे, मांडुकली बंधारे पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे.सावरवाडी : जोरदार पावसामुळेकरवीर तालुक्यातील भोगावती, तुळशी, कुंभी नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे.बहिरेश्वर, कोगे येथील भोगावती नदीपात्रातील लघुबंधारे पाण्याखाली बुडाल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. तालुक्यात गेल्या दोन दिवसांत पावसाने जोर धरल्यामुळे शेती मशागतीच्या कामांना गती येऊ लागली आहे. ऊसपिकावर लोकरी मावा, तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. जोरदार पावसामुळे वीजपुरवठा ग्रामीण भागात खंडित होऊ लागला आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत होऊ लागले आहे. नद्यांची पाणीपातळी वाढू लागल्याने नदीकाठावरील विद्युत मोटरपंप शेतकऱ्यांनी काढले आहेत. यावर्षी पाऊस ४० दिवस विलंबाने सुरू झाल्याने ऊसपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
‘राधानगरी’, ‘वारणा’ ४१ टक्के भरले
By admin | Updated: July 17, 2014 00:34 IST