जिल्ह्यातील ४ हजार कुटूंबांचे पंचनामे पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 04:27 AM2021-07-30T04:27:37+5:302021-07-30T04:27:37+5:30
कोल्हापूर : पुरामुळे झालेले मृत्यू, घरांची पडझड, जनावरांचा मृत्यू तसेच व्यावसायिक अशा चार हजार कुटुंबांचे पंचनामे गुरुवारी पूर्ण झाले. ...
कोल्हापूर : पुरामुळे झालेले मृत्यू, घरांची पडझड, जनावरांचा मृत्यू तसेच व्यावसायिक अशा चार हजार कुटुंबांचे पंचनामे गुरुवारी पूर्ण झाले. जिल्हा प्रशासनाच्या वतीने पंचनाम्यांचे काम वेगाने सुरू असून, अजून २९ हजार ३०३ कुटुंबांचे पंचनामे होणे बाकी आहे. पंचनामे पूर्ण करण्यासाठी कर्मचाऱ्यांना सात दिवसांचा अवधी देण्यात आला आहे. मृत सातपैकी सहा मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत देण्यात आली.
जिल्ह्यात २१ ते २४ तारखेदरम्यान झालेली अतिवृष्टी व महापुराचा फटका दीड लाख लोकांना बसला असून, अनेकांच्या घरांची पडझड झाली आहे. माणसांसह जनावरांचा मृत्यू झाला आहे; तसेच पुराचे पाणी घुसल्याने व्यापारी-व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या पूरबाधितांना शासनाच्या वतीने मदत देण्यात येणार असून त्यासाठीचे पंचनामे जिल्हा प्रशासनाच्या वतीने सुरू करण्यात आले आहेत. गुरुवारपर्यंत तीन हजार ९६३ कुटुंबांचे पंचनामे पूर्ण झाले होते. जिल्ह्यातील सर्व पंचनामे सात दिवसांत पूर्ण करण्याच्या सूचना कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.
---
झालेले नुकसान : पंचनामा पूर्ण झालेली संख्या : पंचनामा करणे शिल्लक असलेली संख्या
अंशत: पडझड झालेली घरे : २ हजार ४९३ :९७१ : १ हजार ५२२
पूर्णत: पडझड झालेली घरे : २७६ : ८४ : १९२
गोठ्यांची झालेली पडझड : ६४७ : १९५ : ४५२
बाधित हस्तकला कारागीर, दुकानदार : ४३ : २ : ४१
इतर व्यावसायिक : १ हजार ९८९ : २७१ : १ हजार ७१८
बाधित कुटुंबे : ३३ हजार २६६ : ३ हजार ९४३ : २९ हजार ३०३
---
मृत्यू झालेली जनावरे
मोठी दुधाळ जनावरे : ८० लहान दुधाळ जनावरे : ६८, ओढकाम करणारी मोठी व लहान जनावरे २०, कोंबड्या : १५ हजार १७८
--
एक मृत्यू अपात्र
पुरामुळे कागल तालुक्यातील सचिन जयराम पाटील, चंदगड येथील सुनीता पांडुरंग कंग्राळकर, अभिषेक संभाजी पाटील, राधानगरीतील वसंत लहू कुपले व सुंदाबाई वसंत कुपले, भुदरगडमधील रत्नाबाई दादू पाटील, शिरोळमधील सोनाबाई आण्णा हांडे यांचे निधन झाले आहे. त्यांपैकी सहाजणांच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाई देण्यात आली. एकाच्या बाबतीत तांत्रिक अडचण आली असून ती दूर करण्यात येत आहे. त्यांच्या कुटुंबीयांनादेखील नुकसान भरपाई देण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिली.
----