सध्याच्या वेळेतच आजपासून निर्बंध कडक होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:33 IST2021-06-16T04:33:59+5:302021-06-16T04:33:59+5:30
कोल्हापूर : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोरोना संसर्ग रोखण्यासाठी निर्बंधांची कडक अंमलबजावणी करण्याचे आदेश जिल्हा व पोलीस प्रशासनाला दिले ...

सध्याच्या वेळेतच आजपासून निर्बंध कडक होणार
कोल्हापूर : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोरोना संसर्ग रोखण्यासाठी निर्बंधांची कडक अंमलबजावणी करण्याचे आदेश जिल्हा व पोलीस प्रशासनाला दिले आहेत. त्यामुळे आज, मंगळवारपासून सध्याच्याच निर्बंधांची कडक अंमलबजावणी केली जाणार आहे. त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी कोल्हापूर शहरात महापालिका प्रशासकांवर, नगरपालिकांमध्ये मुख्याधिकारी व ग्रामीण भागात ग्रामपंचायत प्रशासनावर सोपविली आहे. स्थानिक स्वराज्य संस्था व पोलिसांच्या भरारी पथकाकडून विनाकारण फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.
पवार यांच्या बैठकीनंतर निर्बंध कडक होणार असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे लोकांत सध्याची वेळ वाढविली जाणार का, कडक लॉकडाऊन होणार का, असा संभ्रम तयार झाला. त्याबाबत जिल्हा प्रशासनाकडे चौकशी केल्यावर सध्याची सकाळी ७ ते दुपारी ४ वाजेपर्यंत व्यवहाराची वेळ कायम राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. मात्र, ही वेळ काटेकोरपणे पाळली जाते की नाही यावर लक्ष ठेवले जाणार आहे. पवार येणार म्हटल्यावर ते पुणे शहरात जसे अनलॉक केले तसा निर्णय घेतील, असे अनेक व्यापारी संघटनांना वाटत होते परंतु कोल्हापूरचे रुग्ण आटोक्यात येत नसल्याने पवार यांनी नेमकी कडक भूमिका घेतली.