: ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्याकडे मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : शहरातील यंत्रमाग उद्योगांच्या वीज बिलांची सक्तीने वसुली करू नये. वीज जोडणी सक्तीने बंद केल्यास यंत्रमाग उद्योजकांसह यावर अवलंबून असलेल्या इतर उद्योगातील कामगारांच्या पोटाचा गंभीर प्रश्न निर्माण होईल. यंत्रमागधारकांचे बॅँक कर्ज व हप्ते थकतील व ते आणखीनच अडचणीत येतील. त्यामुळे याबाबत तातडीने योग्य ते आदेश द्यावेत, या मागणीचे निवेदन आमदार प्रकाश आवाडे यांनी ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत व कार्यकारी अभियंता प्रशांत राठी यांना दिले.
निवेदनात, गेल्या ४ ते ५ वर्षांपासून विविध कारणाने यंत्रमाग उद्योग अडचणीतून मार्गक्रमण करत आहे. यातच कोरोना महामारीमुळे उद्योग अधिक अडचणीत आला. लॉकडाऊनमुळे पूर्ण बाजारपेठा बंद असल्याने व्यापारी येणे बंद असल्याने यंत्रमागधारक वीज बिले एकावेळी भरू शकले नाहीत. यामुळे मागीलवर्षी बिलाचे समान हप्ते केले. मार्च २०२१ ला पुन्हा लॉकडाऊन केले. अद्यापही बाजारपेठा सुरळीत नसल्याने मालाच्या विक्रीत अडचणी येत आहेत. यामुळे यंत्रमागधारकांना आर्थिक संकटांना तोड द्यावे लागत आहे.
सध्या महावितरणकडून ५० टक्के रक्कम भरण्याची सक्ती केली जात असून, बिल न भरल्याने वीज जोडणी सक्तीने तोडली जात आहे. यंत्रमागधारक हे वीज बिल भरणार असल्याने मार्च २०२१ मध्ये बंद झालेली थकीत वीज बिलाच्या हप्त्याची योजना मार्च २०२२ पर्यंत सुरू ठेवावी. यंत्रमागधारक हे मार्च २०२१ पर्यंतची थकीत बिले भरण्यास तयार असून, उर्वरित रकमेसाठी समान हप्ते करून द्यावेत, असे म्हटले आहे. शिष्टमंडळात प्रकाश दत्तवाडे, सतीश कोष्टी, दत्तात्रेय कनोजे, चंद्रकांत पाटील, नारायण दुरगुडे, मोहम्मद रफीक खानापुरे, सोमा वाळकुंजे, चंद्रकांत भोपळे, प्रमोद महाजन यांच्यासह यंत्रमागधारकांचा समावेश होता.
फोटो ओळी
२६०८२०२१-आयसीएच-०६
इचलकरंजीत महावितरणचे कार्यकारी अभियंता प्रशांत राठी यांना आमदार प्रकाश आवाडे यांनी निवेदन दिले. यावेळी प्रकाश दत्तवाडे, सतीश कोष्टी, दत्तात्रय कनोजे आदी उपस्थित होते.