कोपार्डे : ऊस बिले, तोडणी, वाहतूक बिले, कामगारांचा पगार थकल्याने कुंभी-कासारी साखर कारखान्यातील सत्तारूढ गटाचा कारभार चव्हाट्यावर आला आहे. त्यामुळे वार्षिक सर्वसाधारण सभेत सभासद या मुद्द्यावरून आक्रमक होतील या भीतीनेच ‘कुंभी-कासारी’ची सभा ऑनलाईन घेण्याचा घाट घातला असल्याचा आरोप यशवंत बँकेचे अध्यक्ष एकनाथ पाटील यांनी केला. कुंभी-कासारी कारखान्याची सभा सभासदांच्या हक्कांसाठी ऑफलाईन घ्यावी, अशी मागणीही शाहू आघाडीच्यावतीनेे निवेदनाद्वारे करण्यात आली. एकनाथ पाटील यांच्या नेतृत्वाखाली कुंभी-कासारीचे उपाध्यक्ष निवास वातकर यांना यासंदर्भातील निवेदन देण्यात आले. यावेळी संचालक निवास पाटील, प्रकाश पाटील, सुभाष पाटील उपस्थित होते.
यावेळी एकनाथ पाटील म्हणाले, शेतकऱ्यांना जानेवारी, फेब्रुवारी महिन्यांत गाळप झालेल्या उसाची बिले मिळालेली नाहीत. यामुळे सेवा सोसायटीची कर्जे, वीज बिल, घरगुती कार्यक्रम व घरखर्चासाठी लागणाऱ्या पैशांसाठी सावकारांच्या पुढे हात पसरावे लागत आहेत. मार्च महिन्याच्या आत जर उसाची बिले मिळाली नाहीत, तर पीक कर्ज घेणारा शेतकरी कृषी कर्ज व्याज सवलत योजनेला मुकणार आहे. कामगारांचे अकरा महिन्यांचे पगार, ऊस तोडणी, वाहतूक बिले थकली आहेत. याबाबत विरोधक आक्रमक होतील म्हणून कुंभीच्या प्रशासनाने ऑनलाईन वार्षिक सभा घेण्याचा घाट घातला आहे. साखर विक्री व्यवस्था चांगली नसल्याने जुनी तीन लाख साखर पोती विक्रीविना पडून आहेत. यामुळे व्याजाचा भुर्दंड बसत आहे.
यावेळी यशवंत बँकेचे संचालक निवास पाटील यांनी बिले थकल्याने स्थानिक ऊसतोड मजूर व वाहतूकदार दुसऱ्या कारखान्यांकडे वळला आहे. शेतकऱ्यांना खुद्द तोंड करून ऊस कारखान्याला पाठवावा लागत आहे. स्थानिक तोडणी, वाहतूकदारांना वेळेत बिले अदा करा, अशी मागणी त्यांनी केली.
शेतकरी उच्च प्रतीचा ऊस कारखान्याला पाठवत आहे. कुंभीची एफआरपी जादा असल्याचा कांगावा करू नका, या शब्दांत शेतकरी संघटनेचे दादूमामा कामिरे यांनी ठणकावले. यावेळी नामदेव पाटील, युवराज पाटील, दादासो पाटील, एस. एम. पाटील, बी. आर. पाटील उपस्थित होते.
चौकट
जिल्हाधिकाऱ्यांचा ऑफलाईन सभा घेण्यास नकार
‘कुंभी-कासारी’ची वार्षिक सभा ऑफलाईन घेण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे परवानगी मागितली होती; पण कोरोना संसर्गामुळे ऑफलाईन सभा घेण्यास परवानगी दिलेली नाही, असे कुंभी-कासारीचे उपाध्यक्ष निवास वातकर यांनी सांगितले. वातकर म्हणाले, तोडणी, वाहतूकदारांना वेळेत बिले देण्यासाठी प्राधान्य देत आहोत. कुंभीचे प्रशासन शेतकऱ्यांचे हित सांभाळण्यासाठी प्राधान्य देते. कोरोनाच्या काळात साखर विक्री ठप्प झाली, याचबरोबर साखरेचे दर घसरल्याने व शासनाने दिलेल्या किमान विक्री दरापेक्षा कमी दराने विक्री करता येत नाही, यामुळे साखर शिल्लक आहे. कर्मचाऱ्यांना जशी रक्कम उपलब्ध होईल, तसे पगार देत आहे. शासकीय देणी वेळेत अदा करत आहे. थकबाकी वाढू नये यासाठी प्रयत्न आहेत.
शासनाच्या निर्देशाप्रमाणे ऑनलाईन सभेचे नियोजन असून, यात प्रश्न विचारण्याची मुभा राहणार आहे. सभासदांचे हक्क डावलले जाणार नाहीत याकडे लक्ष दिले जाईल, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
फोटो
: ०८ कुंभी-कासारी कारखाना निवेदन
कुंभी-कासारी कारखान्याने ऑफलाईन सभा घेऊन सभासदांचा हक्क जपावा, अशा मागणीचे निवेदन यशवंत बँकेचे अध्यक्ष एकनाथ पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने दिले. यावेळी उपाध्यक्ष निवास वातकर यांनी निवेदन स्वीकारले.