पण २०१९ मध्ये या पुलाच्या पिलरच्या पायाभोवतीचे काही दगड निखळल्याचे लक्षात आल्यानंतर पाया मजबूत करण्यासाठी काँक्रीट रिंग टाकून मजबूत करण्यासाठी निविदा काढली होती. मुंबईस्थित कंपनीने हे काम घेऊन एका उपठेकेदारला हे काम दिले होते. यासाठी पायल घेण्यात येणार होते. त्यासाठी पिलरच्या भोवती मुरूम, दगड, मातीचा २५ ते २७ फूट पुलाच्या पूर्वेकडील पिलरभोवती भराव टाकण्यात आला; पण ठेकेदाराला आर्थिक फटका बसणार हे लक्षात येताच त्याने काम बंद केले. यानंतर ना शासनाने ना ठेकेदारांना या कामाकडे लक्ष दिले आहे. उपकंत्राटदाराने या पुलाच्या कामासाठी स्थानिक लोकांकडून भरावासाठी मुरूम घेतला. मात्र, काम अर्धवट सोडून कंत्राटदार पळाल्याने मुरूम पुरवठा करणाऱ्या स्थानिकांचे २० लाख रुपये अडकले आहेत.
कोट:
या पुलाच्या कामासाठी पिलरच्या भोवती बांध टाकण्यासाठी मुरूम पुरवठा करण्याचे काम केले होते. कामच बंद केल्याने या कामापोटी २० लाखांचे बिल थकवून ठेकेदार गेला आहे. मुरूम पुुरवठा करणारे अनेक जण यामुळे गोत्यात आले आहेत आणि या पुलाचे कामही झालेले नाही.
-हिंदुराव पाटील, दोनवडे
...तर कामाची निविदा का?
महाड दुर्घटनेनंतर राज्यातील सर्व ब्रिटिशकालीन पुलांचे तातडीने स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले. यावेळी कोल्हापूर गगनबावडा मार्गावरील बालिंगा पुलाचेही स्ट्रक्चरल ऑडिट झाले होते. यात पूल मजबूत असल्याचा अहवाल आला होता; पण २०१९ मध्ये या पुलाच्या मजबुतीकरणासाठी निविदा काढण्यात आल्याचे समोर आले असून जर पूल मजबूत होता तर मग अशी कामाची निविदा का काढण्यात आली, असा प्रश्न निर्माण होत आहे.