कोल्हापूर : ‘देशाचे नंदनवन पाहण्याची इच्छा कुणाला नसते, आम्ही १० तारखेला निघालो. रविवारी पहलगामला पाेहोचलो. तीन दिवस तिथे होतो. हल्ला झालेले ठिकाण आमच्या हॉटेलपासून अवघ्या २ ते ३ किलोमीटर अंतरावर. मंगळवारी दुपारी अडीच वाजता हॉटेलमधून बाहेर पडलो आणि हल्ल्याची बातमी आली.. काही तासांपूर्वी आम्ही ज्या नंदनवनात होतो, तिथे आता निष्पापांचे रक्ताचे डाग लागले आहेत हा विचारही वेदनादायी आहे.
आनंदाने सुरू झालेल्या पर्यटनाच्या परतीच्या आठवणी मात्र कायमस्वरूपी दु:खद घटनेची साक्ष देतील...’ ढगफुटीमुळे काश्मीरमध्ये अडकलेले कोल्हापुरातील साने गुरुजी वसाहत येथील युवराज साळोखे कुटुंब गुरुवारी दुपारी सुखरूप पोहोचले. यावेळी त्यांनी ‘लोकमत’ला ही माहिती दिली.
तीन दिवस पहलगाममध्ये प्रिंटिंग प्रेसचा व्यवसाय असलेले साळोखे हे पत्नी व त्यांच्या माहेरचे नातेवाईक असे १० जण जम्मू-काश्मीर येथे पर्यटनाला गेले होते. अमृतसर, वैष्णोदेवी, श्रीनगर, गुलमर्ग करून ते रविवारी पहलगामला आले. रविवार, सोमवार व मंगळवारी दुपारपर्यंत असे तीन दिवस ते पहलगाममध्ये होते.
काही अंतरावरच हल्ला हल्ला झाला ते ठिकाण हॉटेलपासून २ ते ३ किलोमीटरच्या अंतरावर आहे. आदल्या दिवशी सोमवारीच साळोखे कुटुंब त्या ठिकाणी होते. मंगळवारी दुपारी त्यांनी पहलगाम सोडले. वाटेतच त्यांना पहलगाममध्ये हल्ला झाल्याचे कळाले. त्याचदरम्यान ढगफुटीमुळे रस्ते वाहून गेल्याचे कळाले आणि ते अडकले.