पाचगाव : गेल्या अनेक दिवसांपासून पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या पाचगावकरांना आता थेट दूधगंगेचे पाणी मुबलक प्रमाणात मिळणार आहे. त्यासंबंधीची योजना मंजूर करण्यात आल्याची माहिती सरपंच संग्राम पाटील यांनी दिली. या योजनेतून दिवसाला तब्बल २० ते २५ लाख लिटर पाणी पाचगावला मिळणार असल्याचेही पाटील यांनी सांगितले. गिरगावपर्यंत भैरवनाथ पाणीपुरवठा संस्थेने दूधगंगा नदीवरून पाणीयोजना राबविली आहे. त्याच योजनेवर गिरगावपर्यंत पाईपलाईन टाकत दूधगंगेचे पाणी पाचगावपर्यंत आणण्यात येणार आहे. या योजनेसाठी पालकमंत्री सतेज पाटील व दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार ऋतुराज पाटील यांनी विशेष प्रयत्न केल्याचेही पाटील यांनी सांगितले. पाचगाव झपाट्याने वाढत असल्याने येथे नागरी वस्ती मोठ्या प्रमाणात होत आहे. परिणामी, पाण्याची कमतरता भासत आहे. गृहराज्यमंत्री सतेज पाटील हे २०१२ मध्ये मंत्रिमंडळात असताना त्यांनी २२ कोटी रुपयांची पाणीयोजना मंजूर केली होती. परंतु, २०१४ मध्ये राज्य सरकारमध्ये सत्तापालट झाल्यानंतर त्यांनी या योजनेला कात्री लावत ही योजना सहा कोटींवर आणली. या छोट्या योजनेतून लोकांना पाणीपुरवठा करण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाची दमछाक होऊ लागल्याने पालकमंत्री सतेज पाटील यांनी पुढाकार घेत दूधगंगेवरून पाचगावला पाणी देण्यासाठी नवी योजना तयार केली. या योजनेमुळे पाचगावकरांच्या पाण्याचा प्रश्न कायमचा मिटणार आहे.
पाचगावकरांना मिळणार दूधगंगेचे पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:24 IST