कोल्हापूर : गावस्तरावर बालकांच्या सुरक्षेसाठी तसेच समस्याग्रस्त व अडचणीत असलेल्या बालकांना त्वरित मदत मिळण्याकरिता कोल्हापूर जिल्ह्यातील प्रत्येक गावात आता बालसंरक्षण समिती स्थापन होणार आहे. बालकांबाबतीत शासकीय योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणीचे काम समितीवर सोपविण्यात येणार आहे. या संदर्भातील ठराव २६ जानेवारीला होणाऱ्या ग्रामसभेत ग्रामसेवकांनी घ्यायचा आहे. शासन निर्देशानुसार, त्या-त्या गावचे सरपंच समितीचा अध्यक्ष राहणार असून, पोलीसपाटील, ‘आशा’ सेविका, प्राथमिक, माध्यमिक (अनुदानित) शाळा मुख्याध्यापक, शिक्षक, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, स्थानिक सामाजिक प्रतिनिधी, १२ ते १८ वयाचा मुलगा व मुलगी समितीचे सदस्य राहणार आहेत. अंगणवाडी सेविका सदस्य-सचिव राहणार आहे. यात स्थानिक सामाजिक प्रतिनिधींची संख्या तीन राहणार असून, एकूण ११ सदस्य असणार आहेत. गावातील काळजी व संरक्षणाची गरज असणाऱ्या बालकांचा शोध घेणे व त्यांना आवश्यक ती मदत पोहोचविणे, बालसंरक्षण, बालहक्क व बालसहभाग या विषयांवर गावात जनजागृती करणे, शासकीय योजनांची गावस्तरावर माहिती देणे व योजनांचा लाभ मिळवून देण्यास मदत करणे, आदी कार्ये या समितीची आहेत.
आता प्रत्येक गावात बालसंरक्षण समिती
By admin | Updated: January 23, 2015 00:46 IST