संतोष पाटील - कोल्हापूर -दक्षिण आणि उत्तर अशा दोन विधानसभा मतदारसंघांत विभागलेल्या महापालिकेच्या हद्दीतील विकासकामांचे उद्घाटन कोणी करायचे? पत्रिकेत नाव कोणाचे घालायचे? यावरून जोरदार मानापमानाचे नाट्य सुरूआहे. माजी मंत्री सतेज पाटील व आमदार अमल महाडिक, तर आमदार राजेश क्षीरसागर व नगरसेवक सत्यजित कदम यांच्यात राजशिष्टाचारावरून शीतयुद्ध रंगले. विकासकामांचा बोजवारा उडाला असताना, ‘निधी मीच आणला, उद्घाटनही मीच करणार, मी भागाचा प्रतिनिधी आहे’ अशा पोकळ श्रेयवादाचे राजकारण सुरू आहे. आता रखडलेल्या कामांच्या दर्जाचेही श्रेय या नेत्यांनी घ्यावे, अशी मागणी नागरिकांतून जोर धरू लागली आहे.शहराच्या विकासकामांसाठी दहा कोटींचा निधी नगरसेवक सत्यजित कदम यांनी आणल्याची चर्चा आहे. मात्र, हा निधी शहरासाठी आमदारांनी खेचून आणला, असे क्षीरसागर समर्थकांचे म्हणणे आहे. निवडणुकीनंतर कदम यांनी खासदार धनंजय महाडिक यांंच्या उपस्थितीत उद्घाटनांचा सपाटा लावला. क्षीरसागर व कदम यांच्यातील उद्घाटनाचा वाद टोकाला गेल्यानंतर आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांनी राजशिष्टाचाराप्रमाणेच उद्घाटनाची पत्रिका काढावी, पूर्वी उद्घाटने केलेल्या कामांची उद्घाटने करू नयेत, असा आदेश प्रशासनाला दिला. आता माजी मंत्री पाटील व आ. महाडिक समर्थकांचा विकासकामांच्या उद्घाटनावरून नवा वाद सुरू आहे. पाटील यांनी तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडून विकासकामांसाठी निधी आणला. या निधीतील दहा विकासकामांचे नारळ फोडण्याचे नियोजनही केले. दक्षिण व उत्तर मतदारसंघांत विभागलेल्या या विकासकामांच्या उद्घाटन पत्रिकेवर आ. महाडिक व क्षीरसागर यांचा राजशिष्टाचाराप्रमाणे उल्लेख अनिवार्य आहे. मात्र, आमदार महाडिक यांचे नाव उद्घाटन पत्रिकेतून गायब झाले. या मुद्द्याआधारे प्रशासनातील संबंधित अधिकाऱ्यांवर हक्कभंगाची नोटीस बजावण्याची टूम महाडिक समर्थकांनी काढली. त्यामुळे पाटील यांच्या हस्ते होणारे नियोजित उद्घाटनांचे सर्व कार्यक्रम ऐनवेळी रद्द केले. आता विकासकामांची ‘शॉर्ट लिस्ट’ करून फक्त उत्तर मर्यादित भागातील उद्घाटने करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.रखडलेल्या कामांचे सिंहावलोकननिविदा मंजूर करतेवेळी दिसणारी प्रशासनाची घाई व त्यानंतर उद्घाटनावेळी मिरविणारे लोकप्रतिनिधी यांचा उत्साह प्रत्यक्ष कामावर लक्ष ठेवताना जाणवत नाही, असा यापूर्वीचा अनुभव आहे. श्रेयवाद घेताना मग थाटात नारळ वाढवून उद्घाटन केलेल्या, परंतु आता रखडलेल्या कामांचे सिंहावलोकनही सर्वच नेत्यांनी करावे, अशी मागणी होत आहे.श्रेयवादापेक्षा इकडेही लक्ष द्याशहरातील ७०० कोटींच्या विकासकामांचा बोजवारा उडाला आहे. राजकीय अनास्थेमुळे काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजना विविध मंजुरीत अडकली आहे. १०८ कोटींच्या एकात्मिक रस्ते विकास प्रकल्पासह नगरोत्थान रस्ते योजना, रंकाळा प्रदूषण व मजबुतीकरण, सांडपाणी शुद्धिकरण केंद्र, पावसाळी पाणी नियोजन योजना, झोपडपट्टी सुधार योजना, ७२ कि.मी.ची ड्रेनेजलाईन, बी.ओ.टी. (बांधा-वापरा-हस्तांतरित करा)वर कचऱ्यापासून वीजनिर्मिती व कत्तलखाना, मल्टीपल पार्किंग व्यवस्था, आदी सर्व प्रकल्प चार वर्षांपेक्षा अधिक काळ रखडले आहेत.
दर्जाकडे दुर्लक्ष, उद्घाटनांचा श्रेयवाद
By admin | Updated: December 18, 2014 00:00 IST