मुरगूड : सोनाळी येथील विद्युत वितरण कंपनीच्या दुर्लक्षामुळे नागरिकांना जीव मुठीत घेऊन जीवन जगावे लागत आहे. गावातील सर्व्हे करून विद्युत वितरण कंपनीने नागरिकांची गैरसोय दूर करावी या आशयाचे निवेदन सोनाळी ग्रामस्थांनी मुरगूड वीज वितरण कार्यालयाला दिले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, कागल तालुक्यातील सोनाळी हे ३५५० लोकवस्तीचे गाव आहे. गावाचा विस्तार होत असून, वस्ती वाढत आहे. शाळेपाठीमागील नाना नगरमध्ये १५ वर्षांपासून वस्ती आहे. मात्र अद्याप तिथे विद्युत खांब टाकलेले नाहीत. तिथे विजेची सोय होणे गरजेचे आहे. अनेक ठिकाणी जुने लोखंडी विद्युतखांब खराब झालेले आहेत. विद्युत वाहिन्या लोंबकळत आहेत, त्यामुळे त्या कोसळून जीवितहानी होण्याची शक्यता आहे.
प्राथमिक शाळेतील विद्यार्थी खेळत असतात, तिथेच धोकादायक लोखंडी विद्युतखांब आहेत. मुख्य वस्तीतील लोखंडी विद्युतखांब, समाजमंदिराजवळील मुख्य विद्युत डीपीवरून सतत स्पार्किंग होत असते, ती बदलणे गरजेचे आहे. अतिवृष्टीमुळे ओढ्याकडील व शेतजमिनीतील बांधावरील विद्युत खांब कोसळण्याच्या स्थितीत आहेत. भडगाव, निढोरी, पिराचीवाडी, सावर्डे बुद्रुक रस्त्याजवळील लोकवस्तीमध्ये वाढीव खांब टाकावेत, अशी मागणी केली आहे. निवेदन मुरगुडचे उपकार्यकारी अभियंता महेश शेंडे, कर्मचारी प्रवीण पाटील, नम्रता मोरबाळे यांना ग्रामपंचायत सदस्य समाधान म्हातुगडे, संदीप म्हातुगडे, संजय चौगले, शंकर म्हातुगडे, उत्तम पोकलेकर, संदीप कपले, सुरेश कोरे, बसवराज कोरे, मारुती पोवार, नामदेव कोरे, लक्ष्मण भिउंगडे, बाळासो कातोरे, रामचंद्र भिउंगडे, महादेव कोरे उपस्थित होते.