‘कोरोना’बद्दल संरक्षण नाही, अनेक मागण्या प्रलंबित.
जहाँगीर शेख
कागल :
कोरोनाने नगरपालिकांचे अनेक कर्मचारी मृत्युमुखी पडलेले आहेत. त्यात कोल्हापूर जिल्ह्यातील आठजण आहेत. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसास नोकरी मिळावी, तसेच नगरपालिका कर्मचाऱ्यांचे पगार नियमित व्हावेत. यासह अन्य मागण्यांसाठी राज्यातील नगरपालिका कर्मचारी येत्या एक मे पासून बेमुदत संपावर जाणार आहेत, अशी माहिती महाराष्ट्र राज्य नगरपालिका नगरपंचायत कर्मचारी संघटनेच्या वतीने राज्य शासनाला देण्यात आली आहे.
राज्यातील ३६९ नगरपालिका, नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांच्या प्रती शासनाचे पूर्ण दुर्लक्ष झाले आहे. विविध मागण्या प्रलंबित आहेत. कोरोनाशी लढत असताना कागलसारख्या काही नगरपालिका वगळता या कर्मचाऱ्यांना कोरोनासाठी विमा संरक्षणही मिळालेले नाही. गेली आठ महिने पगार नियमित नाहीत. अनेक नगरपालिकांचे पगार तीन-तीन महिने झालेले नाहीत. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे देणे तसेच आहे. नवीन मागण्यांकडे शासन ढुंकूनही पाहत नाही. यापूर्वी दिलेली आश्वासने तशीच आहेत. सफाई कर्मचारी कठीण परिस्थितीत काम करीत आहेत. या पार्श्वभूमीवर एक एप्रिलला काळ्या फिती लावून, तर १५ एप्रिलला लेखणी बंद अंदोलन केले. पण, दखल घेतली नाही. म्हणून आता बेमुदत संपावर जाणार आहोत.
● कोट...
‘कागल नगरपालिकेसारख्या नगरपालिकांनी कोरोना संरक्षण विमा कवच कर्मचाऱ्यां दिले; पण हे काम शासनाने केले पाहिजे. शैक्षणिक कर्मचारी सुरक्षित आहेत, महसूल कर्मचारी पंधरा टक्के उपस्थिती, पण नगरपालिका कर्मचारी शंभर टक्के हजर हवेत, हा दुजाभाव का? नगरपालिका कर्मचारी कोरोना योद्धा म्हणून रस्त्यावर आहेत. पण त्याची शासनाला किंमत नाही. एक मे पासून होणारा संप तीव्र असेल. "
अभिजित गोरे. ( राज्य प्रसिद्ध प्रमुख= नगरपालिका कर्मचारी संघटनेने.)