सेनापती कापशी : लाॅकडाऊनच्या काळातील वीज बिल माफ होईल या आशेवर असलेल्या जनतेकडून वीज वसुलीसाठी कंपनीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी धडाका लावला आहे. दोन ते तीन तासांत रक्कम भरली नाही तर थेट वीज कनेक्शनच कट केले जात आहे. मुगळी (ता. कागल) येथील भाजप कार्यकर्त्यांनी यास विरोध करून अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. तोडलेले वीज कनेक्शन पुन्हा जोडायला लावून अधिकारी व कर्मचाऱ्यांना गावातून बाहेर जाऊ दिले.
वीज वितरणचे अधिकारी मुगळी येथे लॉकडाऊनमधील थकीत वीज बिल न भरलेल्या लोकांचे कनेक्शन कट करण्यासाठी आले व बिल भरण्यासाठी सांगू लागले. लोकांच्याकडेे पैसे
नसल्यामुळे लोकांनी नंतर भरतो, असे सांगितले. यावर कोणतीही कल्पना न देता वीज कनेक्शन तोडले. आम्हाला वरून आदेश आहेत. आम्ही कनेक्शन तोडणारच, आशा भाषेत कापशी येथील वीज वितरणचे अधिकारी व कर्मचारी उद्धट बोलत होते.
यावेळी वैभव पाटील यांनी, जर तुम्ही कनेक्शन कट केले तर आत्मदहन करू असा इशारा दिला. भाजपचे पदाधिकारी दिलीप तिप्पे व सागर मोहिते यांनी महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी फोनवर चर्चा करून शेतकऱ्यांची बाजू मांडली. यावेळी राम चेचर, विनोद पाटील, सोनल बारकाळे, किरण पाटील, राहुल भोसले, सोनल कुणकेकर आदींसह ग्रामस्थ व शेतकरी उपस्थित होते.
फोटो:- मुगळी (ता. कागल) येथे वीज कनेक्शन कट करण्यासाठी आलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना भाजप कार्यकर्त्यांनी चांगलेच धारेवर धरले.