कॉंग्रेस कमिटीमधील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
ते म्हणाले की, सन २०१४ मध्ये मोदींनी ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखवत केंद्रात भाजपचे सरकार स्थापन केले. त्यांच्या कार्यकालास सात वर्षे पूर्ण झाली, तरी कोणताही घटक समाधानी नाही. देशाची अधोगती झाली. नोटबंदी, जीएसटी, अचानक लॉकडाऊन अशा घातकी निर्णयांमुळे देशाचे नुकसान झाले. गेल्या वर्षी कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यानंतर अचानक रात्री १२ वाजता लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. यामुळे कामगारांचे, स्थलांतरितांचे हाल झाले. देशाची अर्थव्यवस्था कोलमडली. अनेक उद्योग, धंदे अडचणीत आले. अनेकांच्या नोकऱ्या धोक्यात आल्या. बेरोजगारी वाढली. हे कमी म्हणून की काय त्यांनी कामगारविरोधी कायदे केले. शेतकरीविरोधी काळे कायदे आणले.
मोदींना कोरोना नियंत्रणात आणता आलेला नाही. देशात व्हेंटिलेटर, ऑक्सिजनची टंचाई आहे. सुरुवातीला ४५ वर्षांवरील लोकांना कोरोना प्रतिबंधात्मक लस दिली जात होती. एके दिवशी मोदींनी ‘मन की बात’मध्ये १८ वर्षांवरील सर्वांना लस देण्याची घोषणा केली. ही घोषणा करताना लसीच्या उपलब्धतेचा विचार केला नाही. परिणामी, लसीकरणाची मोहीम विस्कळीत झाली. कोरोनामुळे फटका बसलेल्यांना २० लाख कोटींची घोषणा केली. पण हे पैसे नेमके कोठे गेले, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
पत्रकार परिषदेस आमदार पी. एन. पाटील, आमदार चंद्रकांत जाधव, आमदार ऋतुराज पाटील आदी उपस्थित होते.
चौकट
पीएम केअर फंडातील व्हेंटिलेटर बंद
पालकमंत्री पाटील म्हणाले की, विविध सामाजिक संस्था, सीएसआरमधून पाच हजार कोटींपर्यंत पीएम केअर फंड संकलित केला. यातून रुग्णालयांना दिलेले व्हेंटिलेटर बंद आहेत. अभिव्यक्ती स्वतंत्र्याची गळचेपी केली जात आहे. जगात सर्वाधिक वेळा भारतातच इंटरनेट बंद करण्याचा पराक्रमही मोदी यांनी केला आहे. मोदींच्या अशा चुकीच्या धोरणामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाची प्रतिमा मलिन होत आहे.
केंद्रामुळेच इंधन दरवाढ
पेट्रोलच्या दराने शंभरी गाठली. डिझेलचा दरही वाढला आहे. याला केंद्र सरकार जबाबदार आहे. इंधन दरवाढीमुळे महागाई गगनाला भिडली आहे. सामान्य, गरिबांचे जगणे अडचणीचे झाले आहे असे पाटील यांनी सांगितले. सात वर्षांत मोदींनी भाषणबाजी करणे, इव्हेंट करीत इमेज मॅनेजमेंट करण्याचाचा प्रयत्न केल्याचाही आरोप त्यांनी केला.