लोकमत न्यूज नेटवर्क
सडोली (खालसा) : नंदवाळ (ता. करवीर) येथील विठ्ठल तीर्थक्षेत्र विकासासाठी शासनाने शासकीय जमीन उपलब्ध करून द्यावी अन्यथा टाळ-मृदंगाच्या गजरात लाखो वारकऱ्यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून आंदोलन करण्याचा निर्णय विठ्ठल मंदिर विस्तारीकरण, विकास कृती समिती, वारकरी, ग्रामस्थ यांच्या बैठकीत घेण्यात आला. अध्यक्षस्थानी सरपंच अस्मिता कांबळे होत्या.
यावेळी मल्हार सेनेचे सरसेनापती बबन रानगे म्हणाले, शासनाने मंदिराला तीर्थक्षेत्र दर्जा दिला; परंतु भाविकांना सुविधा पुरविण्यासाठी जमीन उपलब्ध का केली नाही? यासाठी वारकऱ्यांची चळवळ उभी करण्याची गरज आहे.
माजी जिल्हा परिषद सदस्य बाबासाहेब देवकर म्हणाले, भाविकांचा लढा यशस्वी करण्यासाठी लोकचळवळ उभी करून आंदोलनाचे हत्यार हातात घेतल्याशिवाय शासनाला जाग येणार नाही. राजू सूर्यवंशी म्हणाले, शासनाने हा लढा जिंकण्यासाठी सर्वांनी गट-तट न मानता एकत्र येण्याची गरज आहे. हंबीरराव पाटील म्हणाले, मंदिराला शासकीय जमीन मिळविण्यासाठी रस्त्यावरची लढाई लढू; प्रसंगी न्यायलयीन लढा लढू.
यावेळी दिगंबर मेडसिंगे, सखाराम चव्हाण, तानाजी निकम, तानाजी कांबळे, सागर पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. बैठकीला कृष्णात पाटील, जोतीराम पाटील, सागर गुरव याच्यासह परिसरातील वारकरी, सर्वपक्षीय नेते, ग्रामस्थ, दिंडीचालक उपस्थित होते.