गडहिंग्लज : कडगाव (ता. गडहिंग्लज) येथील तळीमाळ नावाच्या शेतात आणि गावातील जुन्या पोस्ट गल्लीतील कडूनिंबाच्या झाडावर वीज कोसळून तळीमाळ शेतातील घटनेत १४ बकरी मृत्युमुखी पडली; तर विष्णू दामोदर कदम (वय ४५, रा. जालना) हे जखमी झाले; तर पोस्ट गल्लीतील घटनेत मंगल बाबूराव चौगुले (३५, रा. कडगाव) यांनाही धक्का बसला. मात्र, दोघांची प्रकृती ठीक आहे. ही घटना आज, मंगळवारी दुपारी घडली. दुपारी चारच्या सुमारास वादळी वार्यासह वळवाच्या पावसाने कडगाव परिसराला झोडपले. त्याचवेळी दोन ठिकाणी विजा कोसळून वरील घटना घडल्या. वादळी वार्यामुळे अशोक राजाराम शेवाळे व सुनील ज्ञानदेव केसरकर यांचे शेडनेट जमीनदोस्त झाले, तर काही घरांचे पत्रे व कौले उडून गेली. श्री क्षेत्र आदमापूर येथील बाळूमामा देवस्थानची २००० बकरी कडगाव येथे चरण्यासाठी आली आहेत.त्यांपैकी रावसाहेब पन्हाळकर यांच्या शेतात बसविण्यात आलेली बकरी अशोक रंगराव कुंभार यांच्या गट नंबर १३८४ (ब) या शेतात चरत होती. अचानक पाऊस आल्यामुळे आसर्यासाठी ती शिसवाच्या झाडाखाली आली होती. झाडाखाली साचलेल्या पाण्यात काही बकरी थांबली होती. त्याचवेळी झाडावर वीज कोसळली. ती वीज पाण्यात उतरल्यामुळे पाण्यातील १४ बकरी मृत्युमुखी पडली, तर पळून गेल्यामुळे एक पिल्लू बचावले. वीज पडल्यामुळे बकर्यांचे राखणदार विष्णू कदम यांच्या पाठीला दुखापत झाली. पळून जाताना ठेच लागून पडल्याने त्यांच्या चेहर्यालाही दुखापत झाली आहे. दरम्यान, जुन्या पोस्ट गल्लीतील मंगल चौगुले या परड्यात गवत आणण्यासाठी गेल्या असता कडूनिंबाच्या झाडावर वीज पडली. त्यामुळे त्यांना जबरदस्त धक्का बसला. कदम व चौगुले यांच्यावर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून दोघांचीही प्रकृती ठीक आहे. तहसीलदार हनुमंत पाटील, निवासी नायब तहसीलदार रामदास खोत, पोलीस निरीक्षक रामदास इंगवले, सभापती अमर चव्हाण, जिल्हा परिषद सदस्य शिवप्रसाद तेली, उपसरपंच नेताजी पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली. मंडल अधिकारी प्रकाश जोशिलकर व तलाठी संजय राजगोळे, पोलीस पाटील पुंडलिक चिकोडे, पशुसंवर्धन अधिकारी घालवाडकर व मुल्ला यांनी घटनेचा पंचनामा केला. (प्रतिनिधी)
वीज पडून १४ बकरी मृत्युमुखी
By admin | Updated: May 21, 2014 17:32 IST