गगनबावडा : कारखान्याच्या सन २०२०-२१ च्या गाळप हंगामात ऊसपुरवठा केलेल्या उसास जाहीर केल्यानुसार ५० रुपयांचा अंतिम हप्ता दिवाळीपूर्वी अदा करणार आहे. कारखान्याच्या ४५ के.एल.पी.डी. क्षमतेच्या डिस्टिलरी व इथेनॉल प्रकल्पाची उभारणी पूर्ण झाली असून नोव्हेंबरमध्ये हा प्रकल्प सुरू करणार असल्याचे प्रतिपादन कारखान्याचे चेअरमन व पालकमंत्री सतेज पाटील यांनी व्यक्त केले. पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील सहकारी साखर कारखान्याच्या २७ व्या ऑनलाइन वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते.
पाटील म्हणाले ‘गळीत हंगाम सन २०२०-२१ मध्ये तोडणी वाहतूक खर्च वजा जाता निव्वळ एफ.आर.पी. २८२२ रुपये होती. मात्र कारखान्याने एफ.आर.पेक्षा १२८ रुपये जादा देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार गळितास आलेल्या उसास पहिला हप्ता २९०० रुपयांप्रमाणे अदा केला असून उर्वरित ५० रुपयांचा अंतिम हप्ता दिवाळीपूर्वी अदा करणार आहोत. डी. वाय. पाटील साखर कारखान्याने नेहमीच जिल्ह्यातील इतर कारखान्यांच्या बरोबरीने दर दिला आहे. कारखान्याच्या डिस्टिलरी व इथेनॉल प्रकल्पाची उभारणी पूर्ण झाली असून नोव्हेंबरमध्ये हा प्रकल्प कार्यान्वित होणार आहे. कारखान्याच्या सहवीज निर्मिती, डिस्टिलरी व इथेनॉल या उपपदार्थ प्रकल्पांच्या माध्यमातून भविष्यकाळात शेतकऱ्यांना जादा ऊस दर देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आगामी गळीत हंगाम कारखान्याने ५ लाख मे. टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे
विषय पत्रिकेचे वाचन कार्यकारी संचालक जयदीप पाटील यांनी केले. सभेस कारखान्याचे संचालक मानसिंग पाटील, बजरंग पाटील, दत्तात्रय पाटणकर, खंडेराव घाटगे, चंद्रकांत खानविलकर, बंडोपंत कोटकर, जयसिंग ठाणेकर, रवींद्र पाटील, श्यामराव हंकारे, उदय देसाई उपस्थित होते. सेक्रेटरी नंदू पाटील यांनी आभार मानले.
फोटो ओळ : पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील सहकारी साखर कारखान्याच्या २७ व्या ऑनलाइन वार्षिक सर्वसाधारण सभेप्रसंगी कारखान्याचे चेअरमन व पालकमंत्री सतेज पाटील व संचालक मंडळ.
----------------------