कोल्हापूर : ‘के एमटी’च्या ताफ्यात केंद्र शासनाच्या जवाहरलाल नेहरू नागरी पुनरुत्थान योजनेअंतर्गत मंजूर ४४ कोटी रुपयांतून १०४ बसेसची खरेदी करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यातील १९ बसेसचा लोकार्पण सोहळा आज, शनिवारी भवानी मंडप येथे सकाळी अकरा वाजता होणार आहे. अत्याधुनिक बनावटीच्या व विशेष सुविधा असणाऱ्या या बसेसमुळे ‘केएमटी’ला ऊर्जितावस्था येण्याची आशा कर्मचाऱ्यांना लागून राहिली आहे. दरम्यान, महापौरांच्या राजीनाम्याचे पडसाद या सोहळ््यावर उमटले असून, वाद टाळण्यासाठी निमंत्रण पत्रिका न काढता सोहळ््याला उपस्थित राहण्याचे जाहीर आवाहन महापालिका प्रशासनाने केले. नव्या बसेस ३४ आसन क्षमता व जीपीएस तंत्रप्रणाली असलेल्या आहेत. अत्याधुनिक पद्धतीच्या या बसेस रस्त्यावर आल्यानंतर खऱ्या अर्थाने केएमटीला आर्थिकदृष्ट्या ऊर्जितावस्था येणार असल्याचे परिवहन विभागाचे म्हणणे आहे. कर्मचाऱ्यांना दोन-दोन महिने पगारासाठी वाट पाहावी लागत आहे. गेल्या काही वर्षांपासून आर्थिक अरिष्टातून कर्मचाऱ्यांची सुटका होणार आहे. (प्रतिनिधी)प्रशासनाची गोचीकार्यक्रमपत्रिकेत महापौर तृप्ती माळवी यांचे नाव घालण्याचा अनेक नगरसेवकांचा आग्रह होता. राजशिष्टाचाराप्रमाणे महापौरांचे नाव पत्रिकेत प्रशासनास घालावेच लागेल, असे प्रशासनाचे मत होते. त्यामुळे पत्रिका न काढताच कार्यक्रम घेण्याचा तोडगा काढण्यात आला. सत्ताधाऱ्यांनी आपापल्या नेत्यांना निमंत्रण दिले आहे. ‘मानापमाना’च्या या नाट्यावर तोडगा निघाल्याने उद्घाटनास मुहूर्त मिळाला. नव्या बसेससाठी माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांचे मोठे योगदान आहे. या निधीसाठी माजी मंत्री हसन मुश्रीफ व सतेज पाटील, मालोजीराजे यांनी पाठपुरावा केला होता.याचे श्रेय आताच्या सरकारने घेऊ नये, याची पुरेपूर काळजी घेण्यात येत आहे. त्यामुळे निमंत्रण पत्रिका काढल्यास आमदारांसह पालकमंत्र्यांचे नाव छापावे लागले असते, तसेच त्यांना निमंत्रणही द्यावे लागले असते. ‘सेवापूर्तीचा आनंद’ अशा स्वरूपाची मोठी होर्डिंग लावून त्यांवर हसन मुश्रीफ, सतेज पाटील व मालोजीराजे यांच्या छब्या लावण्यात आल्या आहेत.
‘केएमटी’ कात टाकणार
By admin | Updated: May 30, 2015 00:07 IST