भुर्इंज : ‘किसन वीर यांच्या नावाचा असल्याने आणि शेतकऱ्यांंची संस्था असलेल्या किसन वीर कारखान्याने दिल्यामुळे आबासाहेब वीर सामाजिक पुरस्कार माझ्यासाठी पद्मभूषण पुरस्कारापेक्षाही मोठा आहे,’ असे प्रतिपादन ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत, स्वातंत्र्यसैनिक आणि सर्वोदय चळवळीतील अग्रणी न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी यांनी केले. येथील किसन वीर कारखान्याच्या वतीने कारखान्याचे संस्थापक किसन महादेव तथा आबासाहेब वीर यांच्या ११० व्या जयंतीनिमित्त न्या. नरेंद्र चपळगावकर यांच्या हस्ते न्या. धर्माधिकारी यांना आबासाहेब वीर सामाजिक पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले तर प्रमुख पाहुणे म्हणून वैधानिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष उल्हास पवार उपस्थित होते. सन्मानपत्र, एक लाख रुपये रोख, शाल, पुष्पगुच्छ, श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप होते. धर्माधिकारी म्हणाले, ‘किसन वीर यांचे कार्यच असे होते की, ते माझ्यासाठी राज्याच्या मुख्यमंत्र्यापेक्षाही मोठे होते. किसन वीर कारखाना परिसरात सर्वोदयाचा जागर झाल्याचे दिसून येत आहे. वैभवशाली लग्न संस्कार हा अंत्यसंस्कार ठरतोय, हे अनेकांच्या लक्षात येत नाही. त्यामुळे हुंडा पद्धत बंद झाली पाहिजे, विवाह सोहळे अतिशय साध्या पद्धतीने झाले पाहिजेत, व्यसनाधीनता हद्दपार केली पाहिजे,’ असा आग्रह त्यांनी आपल्या मनोगतातून मांडला. यावेळी, न्या. नरेंद्र चपळगावकर, उल्हास पवार, मदन भोसल यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी शहीद जवान सूरज मोरे यांच्या कुटुंबीयास न्या. धर्माधिकारी यांच्या हस्ते एक लाखाचा मदतनिधी देण्यात आला. कार्यक्रमास वर्धा येथील सेवाग्राम आश्रमाचे अध्यक्ष जयवंत मठकर, डॉ. सुगंध बरंठ, ज्येष्ठ नेते शंकरराव गाढवे, कारखान्याचे उपाध्यक्ष गजानन बाबर, प्रल्हाद चव्हाण, प्रा. संभाजीराव पाटणे, वसंतराव जगताप, प. ना. पोतदार, पै. साहेबराव जाधव, शंकरराव पवार, डॉ. नीलिमा भोसले, भैय्यासाहेब जाधवराव यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. नंदकुमार निकम यांनी स्वागत केले. मानपत्राचे वाचन अनिल जोशी यांनी केले. स्रेहल दामले व जयवंत पिसाळ यांनी सूत्रसंचालन केले. अॅड. प्रताप देशमुख यांनी आभार मानले. (वार्ताहर)
किसन वीर पुरस्कार पद्मभूषणपेक्षाही मोठा
By admin | Updated: September 5, 2015 23:25 IST