कळंबा: गेल्या चार दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे ऐतिहासिक शाहू कालीन कळंबा तलाव स्थापनेपासून पहिल्यांदा जून महिन्याच्या अखेरीस सांडव्यावरून ओसंडून वाहू लागला. याचे फोटो, व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होताच सांडव्यानजिक पर्यटकांची मोठी गर्दी उसळली होती. कळंबा तलावाची पाणीपातळी मंगळवारी सायंकाळी सव्वीस फुटांवर पोहोचली होती. गेल्या चार दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे बुधवारी पहाटे पाणीपातळीत झपाट्याने वाढ होवून पाणी सांडव्यावरून ओसंडून वाहू लागले. स्थापनेपासून पहिल्यांदा जुन महिन्याच्या अखेरीस सांडव्यावरून पाणी वाहू लागल्याचे पर्यटकांची मोठी गर्दी झाली होती. तर पाणीप्रश्न मार्गी लागल्याने ग्रामस्थांतून समाधान व्यक्त होत आहे. हुल्लडबाजांना आवरा तलाव ओसंडून वाहू लागल्याने याठिकाणी नागरिकांची गर्दी होते. दरम्यानच, मद्यधुंद अवस्थेत त्रास देणाऱ्या हुल्लाडबाजांचा त्रास पर्यटकांना होतो. करवीर पोलिसांनी त्यांना आवर घालण्याची मागणी नागरिकांतून होत आहे. सावधानता बाळगा तलावाच्या मनोऱ्याचे लोखंडी संरक्षक कठडे नसल्याने सेल्फी काढण्याच्या नादात तलाव पात्रात कोसळण्याची शक्यता असल्याने पर्यटकांनी काळजी घ्यावी. पाण्याचा प्रवाह जोरदार असल्याने सांडव्याच्या भिंती वरुन प्रवास करणे टाळावे.
कोल्हापुरातील कळंबा तलाव पहिल्यांदाच जूनमध्ये 'ओव्हर फ्लो', पर्यटकांची गर्दी उसळली
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2025 12:01 IST