मुंबईत जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची घेतली भेट
लोकमत न्यूज नेटवर्क
वारणानगर : कृष्णा खोरेच्या लवादाप्रमाणे महाराष्ट्राच्या वाट्याला असलेले वाहून जाणारे पाणी अडविण्यासाठी जुने आवश्यक नसणारे पाणी उपलब्धता परवाने रद्द करून नवीन लघू पाटबंधाऱ्यांना परवाने द्यावेत, अशी मागणी आमदार डॉ. विनय कोरे यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे मुंबई येथील झालेल्या बैठकीत केली. याबाबत सर्वेक्षण करून १५ दिवसांत अहवाल प्राप्त होताच पुढील कार्यवाही करण्याचे आश्वासन मंत्री जयंत पाटील यांनी दिले.
मुंबई येथे मंत्री जयंत पाटील यांच्या दालनात झालेल्या बैठकीत आमदार डॉ. विनय कोरे यांनी भेट घेऊन मतदारसंघातील शाहुवाडी तालुक्यातील पिशवी येथील जांभूळवाडा या १.७ चौरस किलोमीटर पाणलोट क्षेत्र असणाऱ्या लघुपाटबंधारे प्रकल्पात १.३९६ द्शलक्ष घनमीटर इतका पाणीसाठा उपलब्ध होणार आहे. मात्र, पाणी उपलब्ध परवाना नसल्याने हा प्रकल्प प्रलंबित राहिला असल्याचे निदर्शनास आणून दिले. तसेच कृष्णा खोरे लवादाप्रमाणे वाहून जाणारे पाणी अडविण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रातील जुन्या लघुपाटबंधारेंना शासनाने पाणी उपलब्धता परवाने दिले आहेत. मात्र, आज त्या ठिकाणी काही मोठ्या योजनातून शेतीला पाणी मिळत आहे, तर काही वनखात्याच्या मंजुरीच्या अडचणीत सापडले आहेत. त्या लघुपाटबंधारे प्रकल्पांना पाणी उपलब्धता परवाने प्राप्त आहेत ते रद्द करून आवश्यक ठिकाणी लघुपाटबंधाऱ्यांना पाणी उपलब्धता परवाने दिल्यास शेकडो एकर शेती पाण्याखाली येणार असल्याची मागणी आमदार विनय कोरे यांनी केली.
याबाबत पंधरा दिवसांत सर्वेक्षण करण्याचे मंत्री पाटील यांनी जलसंपदा विभागाला आदेश दिले. त्याचा अहवाल आल्यानंतर तत्काळ नवीन लघू पाटबंधाऱ्यांना मंजुरी देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. यावेळी कृष्णा खोरे विकास महामंडळाचे अधिकारी उपस्थित होते.
.
फोटो ओळी - मुंबईत झालेल्या शाहूवाडी-पन्हाळा मतदारसंघातील लघू पाटबंधारे प्रकल्पासंदर्भातील बैठकीत जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याशी आमदार डॉ. विनय कोरे व शिष्टमंडळाने चर्चा केली. यावेळी कृष्णा खोरे विकास मंडळाचे अधिकारी.