कोल्हापूर : संभाव्य पुराच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी करवीर प्रांताधिकारी मौसमी चौगुले यांनी प्रयाग चिखली, आंबेवाडी व रेडेडोह परिसराची पाहणी केली. यावेळी त्यांनी २०१९, २०२१ व २०२४ मधील पूरपरिस्थितीत करण्यात आलेल्या स्थलांतराचा आढावा घेतला. तसेच यंदाही संभाव्य पूरस्थिती लक्षात घेता, नागरिकांचे सुरक्षितपणे स्थलांतर झाल्यानंतर त्यांच्या निवारागृहांची स्थिती चांगली ठेवण्याची सूचना केली.गरोदर माता, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक व जनावरांसाठी सुरक्षित जागी स्थलांतर करण्यावर भर द्या. नैसर्गिक आपत्तीच्या काळात ग्रामस्तरीय कर्मचाऱ्यांनी २४ तास मुख्यालयात उपस्थित राहावे, प्रत्येक घटनेची माहिती तत्काळ तालुका नियंत्रण कक्षाला कळवावी. या कामकाजात हलगर्जीपणा आढळल्यास आपत्ती व्यवस्थापन अधिनियमांतर्गत कठोर कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.याच विषयाच्या अनुषंगाने मौसमी चौगुले यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ताराराणी सभागृहात बैठक झाली. यावेळी चौगुले यांनी सर्व पोलिस पाटील व ग्राम महसूल अधिकाऱ्यांना कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने सतर्क राहावे. जिल्हा परिषद व पंचायत समिती प्रभागरचना सुरू असल्याने ते कामकाज शांतता व कायदेशीररीत्या पार पडावे, यासाठी सर्व यंत्रणांनी सहकार्य करावे, संभाव्य पूरपरिस्थिती लक्षात घेता, सर्व संबंधित गावांतील ग्रामसेवक, ग्राम महसूल अधिकारी व पोलिस पाटील यांनी पूर्वतयारी ठेवावी. पुरामुळे रस्ते बंद झाल्यास तत्काळ बॅरिकेडिंग करून त्या ठिकाणी सूचनाफलक लावावेत, कोणतीही दुर्घटना होणार नाही याची खबरदारी घ्यावी, अशा सूचना केल्या.
Kolhapur: पुराच्या पार्श्वभूमीवर आंबेवाडी, प्रयाग चिखली परिसराची पाहणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2025 17:59 IST