आजरा : चक्रीवादळामुळे झालेल्या अवकाळी पावसामुळे आजरा तालुक्यातील हिरण्यकेशी नदीची पाणी पातळी अचानक वाढली. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे विद्युतपंप पाण्याखाली गेले आहेत. शेतीपिकांचेही नुकसान झाले आहे. तलाठी व कृषी विभागाच्या प्रतिनिधींनी तातडीने पंचनामे करावेत व शासनाने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी श्रमिक मुक्ती दलाने केली आहे.
कोरोनामुळे आधीच अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांचे या अवकाळी पावसाने प्रचंड नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे होऊन तातडीने विद्युत पंपांची शंभर टक्के नुकसानभरपाई मिळाली पाहिजे. याबरोबर वादळामुळे झाडे उन्मळून पडली आहेत, घरांचे पत्रे, खापऱ्या उडून गेल्या आहेत. त्यांचेही पंचनामे होऊन नुकसानभरपाई मिळाली पाहिजे.
याबाबत तहसीलदार आजरा यांना लॉकडाऊन उठल्यानंतर प्रत्यक्ष भेटून आम्ही निवेदन देणार आहोत तरी तहसीलदार आजरा यांनी सर्कल, तलाठी, महावितरण व कृषी विभागाचे प्रतिनिधी यांना योग्य ते निर्देश देऊन पंचनामे करावेत, असे आवाहन श्रमिक मुक्ती दलाने केले आहे.
पत्रकावर, श्रमिक मुक्ती दलाचे कार्याध्यक्ष कॉ. संपत देसाई, प्रकाश मोरूस्कर, मुकुंद नार्वेकर, कृष्णा सावंत, मारुती पाटील, सयाजी कोडक, नंदकुमार देसाई, निवृत्ती फगरे, मयुरेश देसाई, पांडुरंग देसाई, अतुल देसाई, यशवंत कोडक, दिलीप देसाई या शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.