लोकमत न्यूज नेटवर्क,
कोल्हापूर : अत्यावश्यक सेवेअंतर्गत दळप-कांडप व्यावसायिकांचे ऑक्टोबर २०२० पर्यंतचे कोरोना काळातील वीज बिल माफ करावे,अशी मागणी जिल्हा दळप कांडप गिरणी मालक संघातर्फे सोमवारी निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
जिल्हा प्रशासनाने कोरोनाच्या काळात अत्यावश्यक सेवा म्हणून दळप कांडप गिरणींचा समावेश केला. या काळात जिवाची पर्वा न करता गिरणी मालकांनीही समाजाचा एक घटक म्हणून समाज सेवा केली. राज्य शासनाने कोरोना काळातील वीज बिल माफ करतो, अशी घोषणा केली होती; पण त्याचा विचार अद्यापही केलेले नाही. उलट वीज बिल भरण्याचा तगादा लावला आहे. जोपर्यंत उन्हाळी अधिवेशनात सरकार वीज बिल माफीची घोषणा करीत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवले जाणार आहे. या काळात वीज कनेक्शन तोंडण्याची वा दादागिरी केली तर सर्व गिरण मालक, चालक तीव्र आंदोलन करतील, असा इशारा यावेळी संघातर्फे प्रशासनाला दिला. यावेळी संघाचे अध्यक्ष राजेंद्र वराळे, चंद्रकांत आसबे, संजय फासके, अशोक पाटील, श्रीनिवास साळोखे, बाबा पार्टे, जयकुमार शिंदे, आदी उपस्थित होते.
फोटो : ०८०२२०२१-कोल-गिरणी मालक
ओळी : कोरोना काळातील वीज बिल माफ करावे, या मागणीकरिता निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे यांना सोमवारी कोल्हापूर जिल्हा दळप-कांडप गिरणी मालक संघाने निवेदन दिले.