पन्हाळा : पन्हाळगडाचा जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश झाला हा जिल्ह्यासाठी अभिमानाचा व सन्मानाचा क्षण आहे. भविष्यकाळात छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्धनीतीमध्ये असलेले पन्हाळगडाचे महत्व व प्रेरणा नवीन पिढीला देण्यासाठी हे महत्त्वपूर्ण असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले. जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश झाल्याबद्दल त्यांनी पन्हाळगडास भेट दिली. यावेळी ते बोलत होते.यावेळी पालकमंत्री आबिटकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज, शूरवीर बाजी प्रभू देशपांडे व नरवीर शिवाजी काशिद यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केले. आबिटकर म्हणाले, शिवाजी महाराजांच्या संपूर्ण जीवनामध्ये पन्हाळगडाचे एक वेगळे महत्त्व आहे. पन्हाळगडाचा वेढा, पावनखिंडीतील रणसंग्राम, पन्हाळगडावरील छत्रपतींचे वास्तव्य इतिहासाला एक नवीन प्रेरणा व नवीन प्रेरणेचा जीवनपट उलगडून सांगणारा आहे. अशा पन्हाळगडाचा जागतिक वारसा स्थळांमध्ये समावेश झाला आहे. त्यामुळे नवीन पिढीला पन्हाळगडाचे महत्व समजेल.कोणतेही निर्बंध अथवा चुकीच्या गोष्टी होणार नाहीततसेच छत्रपती शिवाजी महाराजांची युद्धनीती अवलंबण्यासाठी जगभरात त्यांचा आदर्श घेतील. कोणतीही गोष्ट नामांकित केली जाते, तेव्हा त्याचा फायदा स्थानिकांना, परिसरातील तसेच जिल्ह्यातील नागरिकांनाच होतो. वारसा स्थळांच्या यादीतील समावेशाचा पर्यटन वाढीसाठी उपयोग होईल. कोणतेही निर्बंध अथवा चुकीच्या गोष्टी होणार नाहीत. हे यापूर्वीही स्पष्ट केलेले आहे व पुढेही करू. पन्हाळगडावरील तटबंदी असो वा ऐतिहासिक वास्तू यांच्या दुरुस्तीसाठी लागणारा सर्व निधी तात्काळ उपलब्ध करून दिला जाईल असे आश्वासन दिले. यावेळी उपविभागीय अधिकारी समीर शिंगटे, तहसीलदार माधवी शिंदे -जाधव,मुख्याधिकारी चेतन कुमार माळी, गटविकास अधिकारी सोनाली माडकर, माजी नगराध्यक्ष आसिफ मोकाशी, माजी उपनगराध्यक्ष रवींद्र धडेल, चैतन्य भोसले, माजी नगरसेवक रवींद्र तोरसे, रामानंद गोसावी तसेच नागरिक, पालिका प्रशासकीय अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
पन्हाळगडाचा जागतिक वारसास्थळात समावेश हा अभिमानाचा क्षण - पालकमंत्री आबिटकर
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2025 17:28 IST