प्रकाश पाटीलकोपार्डे : शासनाच्या आदेशानुसार जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या मतदारसंघ पुनर्रचनेची प्रक्रिया निवडणूक विभागाने सुरू केली असली तरी हद्दवाढीमुळे त्रांगडे तयार झाले आहे. हद्दवाढीत उचगाव, पाचगाव, कळंबा, उजळाईवाडी या गावांसह पाडळी, बालिंगे येथील कॉलनींचा समावेश होण्याचे संकेत आहेत. ही गावे शहरात गेली तर जिल्हा परिषदेचे किमान दोन मतदारसंघ कमी होणार आहेत. त्यामुळे सगळ्याच मतदारसंघांची अदलाबदल करावी लागणार असल्याने इच्छुकांची घालमेल सुरू आहे.१२ जूनला निघालेल्या नोटिफिकेशनने करवीर तालुक्यात ११ ऐवजी १२ जिल्हा परिषद मतदारसंघ होणार आहेत. १२वा मतदारसंघ कोणता वाढणार याकडे निवडणूक लढवणाऱ्यांचे लक्ष लागून राहिले होते. दरम्यानच्या काळात हद्दवाढीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. हद्दवाढीत उचगाव, पाचगाव, कळंबा, मोरेवाडी, सरनोबतवाडी, उजळाईवाडी या गावांसह पाडळी व बालिंगे या गावांचे गावठाण वगळून कॉलनी अशा आठ गावांचा शहरात समावेश केला जाणार आहेत.मात्र, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक होण्याअगोदर ही हद्दवाढ झाली तर करवीरमधील दोन जिल्हा परिषद मतदारसंघ कमी होणार आहेत. नाही झाली तर एक मतदारसंघ वाढणार आहे. यामुळे जिल्हा परिषद मतदारसंघ वाढणार की कमी होणार याबाबत त्रांगडे निर्माण झाले आहे.जिल्ह्यात करवीर तालुका अडीच प्लॉटचा सर्वांत मोठा तालुका आहे. यात करवीर विधानसभा मतदारसंघ व दक्षिण विधानसभा मतदारसंघ येतात. करवीरमध्ये काँग्रेसला शिवसेनेचे, तर दक्षिणमध्ये भाजपचे तगडे आव्हान आहे. करवीर विधानसभा मतदारसंघात आमदार नरके यांच्या विजयाने शिये, वडणगे, शिंगणापूर, सांगरूळ जिल्हा परिषद मतदासंघात ताकद वाढली आहे. उचगाव, पाचगाव, मुडशिंगी, उजळाईवाडीत आमदार अमल महाडिक यांचा विधानसभा निवडणुकीत विजय झाल्याने भाजपची ताकद वाढली आहे. वाशी, परितेमध्ये आजही काँग्रेसचे वर्चस्व आहे. करवीरमध्ये आपले वर्चस्व टिकवण्यासाठी काँग्रेसला जिवाचे रान करावे लागणार आहे.
मावळत्या जिल्हा परिषदेतील बलाबल
- शिवसेना -२
- काँग्रेस - ८
- अपक्ष -१
करवीर पंचायत समिती
- काँग्रेस- १६
- शिवसेना- ४
- भाजप -२
हद्दवाढीला गावांचा विरोध असल्याने ती शहरात घेण्याचा प्रश्नच येत नाही. याचबरोबर महाराष्ट्र शासनाने जिल्हा परिषदेच्या प्रभागांच्या भौगोलिक सीमा निश्चित करण्याचा कार्यक्रम जाहीर केला आहे; पण निवडणूक आयोगाचेही याबाबत धोरण अजून जाहीर झालेले नाही. यामुळे करवीर तालुक्यातील जिल्हा परिषद मतदारसंघ कमी होणार नाहीत. -आमदार चंद्रदीप नरके