इचलकरंजी : शहरात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने नगरपालिका प्रशासन विविध उपाययोजना राबवित आहे. त्या पार्श्वभूमीवर सध्या शहर व परिसरातील आठवडी बाजार पालिकेने रद्द केले आहेत. नगरपालिकेने ठरवून दिलेल्या ठिकाणी व वेळेतच बाजारासाठी परवानगी दिली आहे. मंगळवारी अतिक्रमण विभागाने मोहीम राबवित नियम मोडणाऱ्या विक्रेत्यांना समज देत विक्री बंद केली.
शहर व परिसरात मंगळवार व शुक्रवारी आठवडी बाजार भरतो. आठवडी बाजारामुळे नागरिकांची अनावश्यक गर्दी होत आहे. वाढत्या कोरोना महामारीमुळे नगरपालिकेने आठवडी बाजार न भरविण्याचा निर्णय घेतला. त्यास उपाय म्हणून पालिकेने ठरवून दिलेल्या अठरा ठिकाणी सकाळी सात ते अकरा या वेळेत बाजार भरविण्याचे ठरले. मात्र, या ठिकाणीही नागरिक गर्दी करताना दिसत होते. तसेच अकरा वाजल्यानंतरही बाजार सुरू ठेवण्यात येत होता. याबाबत वारंवार तक्रारी येत होत्या. सोमवारी (दि.२६) प्रांत कार्यालयात झालेल्या लोकप्रतिनिधी व प्रशासनाच्या बैठकीत बाजारामध्ये होत असलेली गर्दी आटोक्यात आणण्यासाठी कडक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार नगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने नियम मोडणाऱ्या भाजीपाला विक्रेत्यांना समज देत विक्री बंद केली. यापुढे नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला. नगरपालिकेच्या कारवाईमुळे काही ठिकाणी बाजार बंद ठेवण्यात आला होता.