कोल्हापूर : महापालिकेच्या माध्यमातून शासकीय व गोरगरिबांच्या जागा हडप करणाऱ्यांना ‘गोकुळ’वर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही. त्यांनी सभेला उपस्थित राहावेच, तेथील आदर्श कारभार पाहून तसा स्वत:च्या संस्थेत करावा, अशी टीका माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी केली. स्वार्थी प्रवृत्तीने आरोप करून संघ ताब्यात घेऊ पाहणाऱ्या उसन्यांचे स्वप्न पूर्ण होणार नसल्याचेही त्यांनी सांगितले. ‘गोकुळ’ची सर्वसाधारण सभा बुधवारी (दि. ७) होत आहे. सभेच्या पार्श्वभूमीवर विरोधी आमदार सतेज पाटील यांच्याकडून कारभारावर जोरदार टीका केली. विरोधी गटाला ‘जशास तसे’ उत्तर देण्याची तयारी सत्तारूढ गटाने केली असून या सगळ्या पार्श्वभूमीवर ‘गोकुळ’चे नेते महादेवराव महाडिक यांच्याशी संपर्क साधला असता, महाडिक यांनी पाटील यांचे नाव न घेता सडकून टीका केली. ‘गोकुळ’ देशात अव्वल स्थानावर आहे, स्वर्गीय आनंदराव पाटील-चुयेकर यांनी सरकार डेअरीचे सहकारात रूपांतर केले. अरुण नरके, रणजितसिंह पाटील, विश्वास पाटील, रवींद्र आपटे, अरुण डोंगळे, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संघाला यशोशिखरावर पोहोचविले. साडेसात लाख उत्पादक संघाशी संलग्न असून यातील दोन लाख भूमीहीन उत्पादक आहेत. आपण व पी. एन. पाटील संघाचे नेतृत्व करत आहे. पारदर्शक कारभारामुळे संघ नावारूपास आला आहे. काही मंडळींनी संघाच्या कारभारावर तक्रारी केल्या आहेत. आम्ही सरकारी यंत्रणेकडे त्याबाबत खुलासा केला आहे; पण हेच लोक महापालिकेत नेतृत्व करत आहेत. त्यांनी शासकीय व गोरगरिबांच्या जागा हडप करण्याचे काम केले असून अशा लोकांना संघावर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही. ज्यांनी कधी दूध संस्था काढली नाही, जे संघाचे उसने सभासद झाले आहेत, त्यांनी संघावर आरोप करणे म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखे असल्याचे महाडिक यांनी सांगितले. राज्यभर दुष्काळ असताना कोल्हापुरात केवळ दूध व्यवसायाने शेतकऱ्यांना आधार दिला. स्वार्थी प्रवृत्तीने कारभारावर आरोप करणाऱ्यांचे स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही. आरोप करणाऱ्यांनी सभेला उपस्थित राहावेच, संघाचा कारभार पाहावा व तसा आपल्या संस्थेत करण्याचा प्रयत्न करावा, अशी टीकाही त्यांनी केली. ...अन्यथा शेतकरी संघ होईल! एकेकाळी संपूर्ण आशिया खंडात शेतकरी संघाचे नाव होते; पण त्या काळातील राजकारण्यांनी आरोप केले आणि मार्केटिंगवर परिणाम झाला. पुढे संघाचे काय झाले, हे जिल्ह्याला माहिती आहे. त्यामुळे ‘गोकुळ’वर आरोप करताना विचार करावा, अन्यथा शेतकरी संघ होईल, असेही महाडिक यांनी सांगितले. २५० सभासदांचा साखर कारखाना सहकारी कसा? आरोप करणाऱ्यांच्या संस्थांचे काम कसे चालले आहे, हे सांगण्याची गरज नाही आणि मी ते त्यावर बोलणारही नाही; पण केवळ २५० सभासद असणारा साखर कारखाना सहकारी कसा? असा सवालही त्यांनी केला.
जागा हडपणाऱ्यांना ‘गोकुळ’वर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही
By admin | Updated: September 5, 2016 00:53 IST