कोल्हापूर : रानडुकराची शिकार करण्यासाठी बंदुकीचा बार काढून पळून जाणाऱ्या तीन शिकाऱ्यांना वन विभागाने पाठलाग करून पकडले. मात्र, एक आरोपी पळून जाण्यात यशस्वी ठरला. हा प्रकार पन्हाळा वनपरिक्षेत्रातील मौजे उंड्री येथे शनिवारी घडला. अटक केलेल्या तिन्ही आरोपींना दोन दिवसांची वनकोठडी मिळाली आहे.पन्हाळा तालुक्यातील उंड्री येथे जंगल कक्ष क्रमांक ८३९ मध्ये बाजारभोगाव येथील वनरक्षक आणि वनसेवक गस्त घालत असताना, जंगलात तीन शिकारी रानडुकराची शिकार करण्याच्या उद्देशाने फिरत असल्याचे आढळले. बंदुकीचा बार काढल्याच्या आवाजाच्या दिशेने वनरक्षक गेले. त्यांची चाहूल लागताच पन्हाळा तालुक्यातील पुशिरे येथील युवराज दादू पाटील, अजित दिलीप पाटील आणि सुरेश विकास पाटील हे पळून जाण्याचा प्रयत्न करीत होते. मात्र, वनकर्मचाऱ्यांनी त्यांना पाठलाग करून पकडले. या गुन्ह्यातील एक आरोपी फरार झाला आहे.एका बंदुकीसह तीन मोटारसायकली आणि तीन मोबाइल संच, एकूण १.७५ लाख रुपयांच्या मुद्देमालासह जप्त करण्यात आला. या तिन्ही आरोपींना अटक करून त्यांच्या विरोधात वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ चे कलम ९, ५०, ५१ अन्वये गुन्हा नोंदवला आहे. तिन्ही आरोपींना पन्हाळा येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयात हजर केले असता, त्यांना दोन दिवसांची वनकोठडी देण्याचे आदेश देण्यात आले. ही कारवाई उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील, सहायक वनसंरक्षक (वनीकरण व कॅम्प) कमलेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पन्हाळा परिक्षेत्राचे वनअधिकारी अजित माळी, बाजारभोगावचे वनपाल आर.एस. रसाळ, मानवाडच्या वनपाल रूपाली बुचडे, पन्हाळ्याचे वनपाल सागर पटकारे, बाजारभोगावचे वनरक्षक मच्छिद्र नवाळी, कळे येथील वनरक्षक अमर माने, पणुत्रेच्या वनरक्षक अश्विनी मदने, काळजवडेच्या वनरक्षक पूजा नरुटे, कोतोलीचे वनरक्षक बाजीराव देसाई तसेच पन्हाळ्याची आरआरटी टीम यांनी केली.
Kolhapur: रानडुकरावर बंदुकीचा बार, उंड्रीत ३ शिकाऱ्यांना वन विभागाने पाठलाग करून पकडले
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2025 11:42 IST