राम मगदूमगडहिंग्लज : पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांचे बंधू जिल्हा बँकेचे संचालक अर्जुन आबिटकर यांनी रविवारी गडहिंग्लज शहरातील ‘त्या’ माजी नगरसेवकांची भेट घेतली. तब्बल दोन तासांच्या चर्चेत त्यांनी सर्वप्रकारची ‘ताकद’ देण्याची ग्वाहीदेखील ‘त्यांना’ दिल्याची खात्रीलायक बातमी आहे. त्यामुळे पालकमंत्री आबिटकरदेखील गडहिंग्लज नगरपालिका निवडणुकीच्या मैदानात उतरणार असल्याची वंदता असून, गडहिंग्लजमधील त्यांच्या ‘एंट्री’ची शहरात जोरदार चर्चा आहे.दोन वर्षांपूर्वी जनता दलाचे माजी नगराध्यक्ष बसवराज खणगावे, माजी उपनगराध्यक्ष नरेंद्र भद्रापूर व उदय पाटील यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. त्यांच्यामुळे गडहिंग्लज शहरात पक्षाची ताकद वाढली असून, त्यांच्यावर पश्चात्तापाची वेळ येऊ देणार नाही, अशी ग्वाही मंत्री हसन मुश्रीफ यांनी जाहीरपणे दिली आहे. मात्र, अलीकडे झालेल्या ‘राष्ट्रवादी’च्या जाहीर कार्यक्रमात ही ‘त्रिमूर्ती’ दिसली नाही. यावरूनच ते ‘राष्ट्रवादी’तही नाराज असल्याची चर्चा शहरात आहे. या पार्श्वभूमीवरच आबिटकरांनी त्यांची भेट घेतल्यामुळे जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
‘ते’ आपल्यासोबतच..!आठवड्यापूर्वी मंत्री मुश्रीफ यांच्या उपस्थितीत आयोजित ‘गोकुळ’चे अध्यक्ष नविद मुश्रीफ यांच्या सत्कार समारंभात ‘खणगावे व भद्रापूर’ हे आज उपस्थित नसले तरी ते आपल्यासोबत आहेत, असे विधान माजी उपनगराध्यक्ष किरण कदम यांनी केले होते. या पार्श्वभूमीवर आबिटकरांच्या भेटीची शहरात चर्चा आहे.
मुश्रीफांचे बारकाईने लक्षमुश्रीफ यांना ‘गडहिंग्लज’करांच्या मानसिकतेचा परिपूर्ण अभ्यास आहे. म्हणूनच त्यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याहस्ते मुंबईत ‘त्या’ तिघांचा पक्षप्रवेश करवून घेतला होता. त्यानंतर वेळोवेळी झालेल्या पक्षांतर्गत ‘घडामोडी’कडेही त्यांचे बारीक लक्ष आहे. त्यामुळे खणगावे, भद्रापूर यांना ते सहजासहजी ‘राष्ट्रवादी’तून सोडतील असे वाटत नाही.
‘महायुती’मधील दुसरा दरवाजानाराज मंडळी माजी पालकमंत्री सतेज पाटील, माजी मंत्री विनय कोरे, माजी आमदार संजय घाटगे यांच्याही संपर्कात आहेत. म्हणूनच आबिटकरांच्या माध्यमातून नाराजांसाठी महायुतीचा दुसरा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न असावा अशीही चर्चा आहे.
पुन्हा ‘जनता दल-जनसुराज्य’!२००६ मध्ये गडहिंग्लज कारखान्याप्रमाणे गडहिंग्लज नगरपालिकेतही ‘जनता दल-जनसुराज्य’ आघाडीचा प्रयोग यशस्वी झाला होता. तशी मोट नव्याने बांधण्यासाठी सावकरांच्याही हालचाली सुरू असल्याने ‘जनसुराज्य’च्या माध्यमातून जुन्या परिवाराशी जुळवून घेऊन ‘सत्ते’सोबत जाण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून झाल्यास नवल वाटण्याचे कारण नाही.
सूर कायम.. दरी वाढली..!पराभवाची तमा न बाळगता जनता दलाच्या विरोधात उपनगराध्यक्षपदाची निवडणूक लढवून ‘राष्ट्रवादी’ला ऊर्जितावस्था दिलेल्या गुंड्या पाटील यांच्याकडे शहरातील कारभाराची सूत्रे आपसूकच गेली. तरुण सहकाऱ्यांच्या मदतीने त्यांनी विधानसभा निवडणुकीसह अन्य कार्यक्रमातही पक्षाची ‘ताकद’ दाखवली. मात्र, आपल्याला विश्वासात घेतले जात नसल्याचा ‘त्यांचा’ सूर असल्याने दरी वाढली आहे.