म्हाकवे : कोरोनात प्रशासनाला सहकार्य करीत जनतेची ढाल बनलेल्या आशा स्वयंसेवकांना पाच महिन्यांचे वाढीव मानधन दिलेले नव्हते. ते मानधन मिळविण्यासाठीही आशांना संघर्ष करावा लागला. त्यानंतर शासन स्तरावरून जिल्हा परिषदेकडे सुमारे ३ कोटी १० लाख वाढीव मानधनापोटी वर्ग झाले; तर गत पंधरावड्यापूर्वीच संबंधित पंचायत समितीकडे हे मानधन वर्ग करण्यात आले. मात्र, कागल तालुक्यातील आशांना त्याचे अद्यापही वाटप केलेले नाही. त्यामुळे हे मानधन त्वरित वाटप करण्यात यावे अन्यथा संघटनेच्या वतीने मोर्चा काढण्याचा इशारा आशा संघटनेच्या जिल्हा सचिव उज्ज्वला पाटील यांनी दिला आहे.
अन्य तालुक्यांतील आशांना ही रक्कम मिळाली असून याबाबत कागलमधील आशांनी जिल्हा प्रशासनाकडे चौकशी केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. कागलमध्ये २४६ आशा व ११ गटप्रवर्तक कार्यरत आहेत.