कागल : पंतप्रधान सुरक्षा विमा योजनेमुळे अपघाती मृत्यू, जायबंदी झाल्यानंतर विमा रकमेचे संरक्षण मिळणार आहे. ग्रामीण भागातील लोकांना याचा लाभ मिळावा म्हणून मी माझा आमदारकीचा सर्व पगार जनतेचा विमा उतरविण्यासाठी खर्च करणार आहे, असे उद्गार आमदार हसन मुश्रीफ यांनी काढले.बापूसाहेब महाराज चौकात आयोजित योजनेच्या प्रारंभप्रसंगी ते बोलत होते. कागल विधानसभा मतदारसंघातील संजय गांधी निराधार योजनेतील सर्व लाभार्थी आणि इतर गरजू लोकांचा प्रत्येकी १२ रुपयेप्रमाणे एक लाख लोकांचा विमा स्वत: उतरविण्याचा संकल्प त्यांनी जाहीर केला होता. त्याचा प्रारंभ सोमवारी करण्यातआला. आय. सी. आय. सी. सी. बँकेचे कांचन कुलकर्णी यांच्याकडे धनादेश प्रदान केला.मुश्रीफ म्हणाले की, मला दरमहा आमदारकीचा एक लाख रुपये पगार मिळतो. ही रक्कम यासाठी प्रत्येक वर्षी वापरणार आहे. कार्यकर्त्यांनी गावागावांत गरजू लोकांचा विमा उतरविण्यासाठी प्रयत्न करावेत. आय.सी.आय.सी.सी. बँकेचे कांचन कुलकर्णी म्हणाले, सर्वसामान्यांबद्दल आस्था असल्यामुळेच आ. मुश्रीफ यांनी हा संकल्प केला आहे. इतर लोकप्रतिनिधींसमोर त्यांनी आदर्श ठेवला आहे. दरवर्षी १२ लाख रुपये रक्कम ते मतदारसंघातील जनतेसाठी आपल्या उत्पन्नातून खर्च करणार आहेत, ही एक दुर्मीळ घटना आहे.माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर यांनी स्वागत, तर भैया माने यांनी प्रास्ताविक केले. संजय हेगडे, राहुल घोरपडे, शिवानंद माळी यांची भाषणे झाली. युवराज पाटील, गणपतराव फराकटे, नवीद मुश्रीफ, नगराध्यक्षा संगीता गाडेकर, मुरगूडच्या नगराध्यक्षा वसुधा कुंभार, रमेश माळी, प्रवीण भोसले उपस्थित होते. (प्रतिनिधी)
आमदारकीचा पगार जनतेच्या विम्यासाठी
By admin | Updated: July 7, 2015 21:10 IST