वीज बिलप्रश्नी राजू शेट्टी आक्रमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 04:24 AM2021-01-21T04:24:03+5:302021-01-21T04:24:03+5:30
जयसिंगपूर : लॉकडाऊनच्या काळातील घरगुती वीज बिले त्वरित माफ करावीत. शेतकऱ्यांना वीज बिलात सवलत देऊन कृषिपंपांचे प्रलंबित वीज कनेक्शन ...
जयसिंगपूर : लॉकडाऊनच्या काळातील घरगुती वीज बिले त्वरित माफ करावीत. शेतकऱ्यांना वीज बिलात सवलत देऊन कृषिपंपांचे प्रलंबित वीज कनेक्शन त्वरित द्यावेत, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याकडे केली. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याबाबत माहिती घेऊन सकारात्मक विचार करू, असे आश्वासन दिले असल्याची माहिती ऊर्जामंत्री राऊत यांनी शेट्टी यांना दिली.
मुंबई फोर्ट येथे वीज वितरण कंपनीच्या मुख्य कार्यालयात झालेल्या बैठकीत शेट्टी बोलत होते. यावेळी महाराष्ट्र राज्य वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष प्रताप होगाडे उपस्थित होते.
शेट्टी म्हणाले, राज्यात ३१ मार्च २०१८ अखेर पेडपेंडिंग ग्राहकांना उच्चदाब वितरण प्रणाली अंतर्गत जोडण्या दिल्या जाणार होत्या. मात्र, अद्यापही सुमारे ६३ हजार अर्जदारांच्या वीज जोडण्या प्रलंबित आहेत. शेतकऱ्यांची पिके वाळत आहेत, त्यामुळे सर्व प्रलंबित मागण्या तातडीने पूर्ण कराव्यात.
कृषिपंप वीज ग्राहकांचे नवीन सवलतीचे शासकीय वीजदर निश्चित करणे आवश्यक आहे. राज्य शासनाने लघुदाब उपसा सिंचन योजनांचा वीज आकार १.१६ रु. प्रति युनिट तर वैयक्तिक शेतीपंप वीज ग्राहकांचा सवलतीचा वीजदर १ रुपये प्रति युनिट निश्चित करावा. तसेच हे नवीन शासकीय सवलतीचे वीज दर एप्रिल २०२१ पासून लागू करावेत, असे सांगून शेट्टी यांनी विविध प्रलंबित प्रश्नांबाबत लक्ष वेधले.
याप्रसंगी पोपट मोरे, महेश खराडे, राजू शेळके, अर्जुन साळुंखे, शैलेश चौगुले, संजय बेले, भागवत जाधव यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
फोटो - २००१२०२१-जेएवाय-०६
फोटो ओळ - मुंबई येथे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना निवेदन देण्यात आले. यावेळी माजी खासदार राजू शेट्टी, प्रताप होगाडे, पोपट मोरे, महेश खराडे, राजू शेळके यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.