गेल्यावर्षी मार्चमध्ये कोरोना आला आणि मोलकरणी वर्षानुवर्षे ज्यांच्या घरी धुणं-भांडी, फरशी-केर, अशी कामं करून आपले कुटुंब चालवायच्या त्यांची कामं बंद झाली. कामावरच आला नाही म्हणून लोकांनी पगारसुद्धा दिला नाही. सहा-सात महिने घरात बसून काढली, आता पुन्हा काम मिळायला सुरुवात झाली तोपर्यंत परत कोरोना संसर्ग वाढू लागला. अशा परिस्थितीत घरेलू महिला कामगारांना घर कसं चालवायचं याची चिंता लागली आहे. शहरात दहा हजारांवर घरेलू कामगार असून पुन्हा लॉकडाऊन होणार या भीतीनेच त्यांच्या पोटात गोळा आला आहे.
--
मदतही मिळाली नाही..
मोलकरणीला एका कामाचे पाचशे ते सहाशे रुपये मिळतात जे व्यक्ती संख्येवर अवलंबून असतात. धुणं, भांडी, केर काढणे, फरशी पुसणे अशी वेगवेगळी कामं असतात. काही कारणांमुळे बरेच कामावर जाता नाही आले तर पगार कमी होतो. गेल्यावर्षी सहा महिने बसून काढावे लागते पण या काळात मोजकी कुटुंब वगळले तर कोणीही आम्हाला जीवनावश्यक देऊन किंवा आर्थिक मदत केली नाही सरकारने रेशनवर तांदूळ दिले म्हणून कसंबसं पोट भरलो असा अनुभवही या महिलांनी सांगितला.
---
कोरोना सुरू झाल्यावर तीन घरची कामं सुटली. संस्था, दानशूर लोक मदत करायचे त्यात घर चालवलं. आता फक्त एका घरचं काम चालू आहे. कमवणारी मी एकटी. पाचशे रुपयात खर्च कसा भागवायचा.
बेबी मुश्रीफ (लाईन बाजार)
--
आमच्या घरात पाच माणसं, घर माझ्यावरच चालतंय. पाच घरची कामं करत होते. सगळी सुटली. ज्यांच्या घरी काम करायचे त्यांनी मदत पण केली नाही. रेशनवरचं धान्य मिळालं म्हणून एकवेळ तरी पोटभर अन्न मिळायचं. आता परत लॉकडाऊन करणार म्हटल्यावर काम सुटणार आमच्या परिस्थितीचा शासनाने विचार करायला हवा.
शोभा खाडे (शिवाजी पेठ)
--
मी गेल्या २५ वर्षांपासून घरकामाला जाते. विश्वासावर आमचं पोट चालतंय पण कोरोना आला आणि आमच्यावरचा विश्वास पण उडाला. आम्हाला पण स्वत:ची काळजी वाटतेच की, पण हे समजून न घेता लोकांनी आमची कामं बंद केली. घरात नऊ माणसं मिळवणारी मी एकटी म्हणून १० कामं करत होते. आता हॉटेलमध्ये कामाला जात होते ते पण बंद झालं. सांगा आम्ही कसं जगायचं.
शमा मुल्ला (साळोखेनगर)
---