लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : शहरात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असून, मृतांचा आकडाही वाढत आहे. शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या सरस्वती मार्केट व गांधी कॅम्पमधील एका तरुणासह दोघांचा कोरोनाने मृत्यू झाला. त्यामुळे संतप्त बनलेल्या नागरिकांनी भागातील व्यापार व भाजीपाला विक्री बंद पाडली. यावेळी उपनगराध्यक्ष तानाजी पोवार यांनी व्यापारी व नागरिकांना शांत राहण्याचे आवाहन केले व परिसर १५ मेपर्यंत बॅरिकेट्स लावून बंद करण्याचे आदेश दिले.
शहर व परिसरातील बाजारपेठेतील नागरिकांची वाढती गर्दी कोरोनावाढीला कारणीभूत ठरत आहे. पालिका व पोलीस प्रशासनकडून आवाहन करूनही नागरिक गर्दी करत आहेत. त्यामुळे वाढती गर्दी प्रशासनाची डोकेदुखी ठरत आहे. सरस्वती मार्केट व गांधी कॅम्पमध्ये खरेदीसाठी गर्दी होत असल्यामुळे नागरिकांनी प्रशासनाकडे बाजार बंद करण्याची मागणी केली. मात्र, प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले. यातच भागातील दोघांचा कोरोनाने मृत्यू झाल्यामुळे स्थानिक नागरिक अधिकच आक्रमक बनले.
रविवारी सकाळी दहा वाजता भागातील नागरिकांनी रस्त्यावर उतरून व्यापाऱ्यांची दुकाने बंद करण्यास सुरुवात केली. तसेच भाजीपाला विक्रेत्यांना तेथून हाकलून लावले. या प्रकारामुळे व्यापारी व नागरिकांत वाद निर्माण झाला. याची माहिती मिळताच उपनगराध्यक्ष पोवार यांनी धाव घेत नागरिक व व्यापाऱ्यांना शांत केले. यावेळी शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करत १५ मेपर्यंत भागात सर्व व्यवहार व आस्थापने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी सदा मलाबादे यांनी स्पीकरवरून नागरिकांना सूचना करत काळजी घेण्याचे आवाहन केले. त्यानंतर नगरपालिकेने बॅरिकेट्स लावून भाग बंद केला.
फोटो ओळी
०९०५२०२१-आयसीएच-०१
सरस्वती मार्केट, गांधी कॅम्पमध्ये नागरिक व व्यापाऱ्यांत वाद झाला. त्यावेळी उपनराध्यक्ष तानाजी पोवार यांनी परिसर १५ मेपर्यंत बॅरिकेट्स लावून बंद करण्याचे आदेश दिले.