कोल्हापूर : शहरात रस्ते विकास प्रकल्पांतर्गत केलेल्या रस्त्यांच्या कामाचे निविदेमधील दराप्रमाणे मूल्यांकन करण्याचे काम गेले दोन दिवस रात्रं-दिवस सुरू आहे. बुधवारी रात्री उशिरापर्यंत हे काम सुरू होते. आज, गुरुवारी मुंबईत होणाऱ्या बैठकीत नवीन मूल्यांकनाचा अहवाल दिला जाणार आहे. राज्य सरकारने नियुक्त केलेली मूल्यांकन समिती व नोबेल कंपनी यांनी रस्त्यांचे मूल्यांकन केले होते. आयआरबी कंपनीने प्रत्यक्षात २३९ कोटी ६२ लाख रुपये खर्च केल्याचा अहवाल राज्य सरकारला दिला होता शिवाय कोल्हापूर महानगरपालिका आणि सर्वपक्षीय टोलविरोधी कृती समितीने चुकीच्या कामांचे तसेच कराराप्रमाणे न झालेल्या कामांचे मूल्य त्यातून वगळण्याची आग्रही मागणी केली होती. परंतु डीएसआरप्रमाणे केलेले हे मूल्यांकन आयआरबीला मान्य नाही. त्यांनी निविदेमधील दराप्रमाणे मूल्यांकन करण्याची विनंती केली. त्यामुळे सरकारने करारातील तरतुदीप्रमाणे निविदेमधील दराप्रमाणे नव्याने मूल्यांकन करावे, अशी सूचना कृती समिती व महानगरपालिका प्रशासनाला सोमवारी केली. ही सूचना येताच मंगळवार व बुधवार असे दोन दिवस अव्याहतपणे हे काम कृती समितीचे सदस्य राजेंद्र सावंत व प्रसाद मुजुमदार यांनी केले आहे. बुधवारी रात्री उशिरापर्यंत हे काम सुरु होते. (प्रतिनिधी)
सुधारित अहवाल आज देणार
By admin | Updated: August 20, 2015 00:52 IST