भारत चव्हाण कोल्हापूर : जिल्ह्याच्या आणि सत्तेच्या राजकारणात काँग्रेस सध्या एकाकी पडल्याचे चित्र दिसत असले, तरी काँग्रेसच्या हातातून महापालिकेची सत्ता काढून घेण्याचे आव्हान महायुतीसमोर असणार आहे. २०१५ मध्ये झालेल्या निवडणुकीवेळी राज्यात महायुतीची सत्ता असताना काँग्रेसने स्वबळावर सर्वाधिक ३० जागा जिंकून धक्का दिला होता. एवढेच नाही तर राष्ट्रवादी, शिवसेना यांच्याबरोबर आघाडी करून राज्यातील ‘महाविकास’ आघाडीचा सर्वात पहिला प्रयोग महापालिकेत करून दाखवला होता.राज्यातील महायुती आणि महाविकास आघाडी अंतर्गत असलेल्या सर्वच राजकीय पक्षांनी महानगरपालिकेची निवडणूक महायुती व आघाडी म्हणून लढवण्याचा निर्धार केला आहे. परंतु, असा प्रयोग करणे स्थानिक पातळीवर खूप अडचणीचे ठरते. प्रत्येक प्रभागात सर्वच पक्षांचे दोन-तीन उमेदवार इच्छुक असतात. त्यामुळे इच्छुकांचे समाधान करणे नेत्यांना केवळ अशक्य होऊन जाते. त्यातून इच्छुकांच्या ‘बेडूक’ उड्या पाहायला मिळतात. उमेदवारी नाकारली की, सोयीची भूमिका घेतली जाते.महायुती व महाविकास आघाडी म्हणून निवडणुकीला सामोरे जाताना एका प्रभागात तीन पक्ष आणि इच्छुकांची संख्या सहा ते आठ अशी राहणार आहे. प्रभागांची संख्या कमी असल्याचे तसेच एका प्रभागातून चार नगरसेवक निवडून द्यायचे असल्याने उमेदवारी देताना सर्वच पक्षांची मोठी दमछाक होणार आहे.विशेषत: सत्ताधारी महायुतीची डोकेदुखी अधिक होणार आहे. कारण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची शिवसेना, उपमुख्यमंत्री अजित पवारांची राष्ट्रवादी तसेच भाजप यांच्याकडे इच्छुकांची संख्या जास्त आहे. निवडून येण्याची क्षमता असलेल्यांना पक्षात घेण्याची धडपड तीनही पक्ष करत आहेत. त्यामुळेच जागा वाटप करताना घमासान होणार हे नक्की! त्यामुळे मोठ्या प्रमाणात नाराजी निर्माण होण्याची शक्यता आहे.
ताराराणी आघाडी विभागलीगत निवडणुकीत भाजप व ताराराणी आघाडीने ३३ जागा जिंकल्या होत्या. त्यात ताराराणी आघाडीच्या १९ तर भाजपच्या १४ नगरसेवकांचा समावेश होता. आता ताराराणी आघाडी दोन पक्षांत विभागली आहे. काही माजी नगरसेवक भाजपमध्येच राहणार आहेत, तर काही माजी नगरसेवक शिंदेसेनेत गेले आहेत. ताराराणी आघाडीकडे नेतृत्वच राहिलेले नाही.
महायुतीत अधिक रस्सीखेचशहरातील काही विशिष्ट भागात भाजपचा प्रभाव आहे. शिंदेसेनेची छाप सर्वच भागात राहणार आहे. तरीही भाजपने आत्ताच ३३ जागांवर दावा केला आहे. शिंदेसेनेत २२ माजी नगरसेवकांनी प्रवेश केला आहे. त्यांना उमेदवारीची अपेक्षा आहे. आमदार राजेश क्षीरसागर यांचे नेतृत्व मानणारे अनेक कार्यकर्ते आहेत. त्यांचाही उमेदवारीसाठी आग्रह आहे. राष्ट्रवादीचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी तीसपेक्षा अधिक उमेदवारांची यादी करा, अशा सूचना दिल्या आहेत. त्यामुळे महायुतीत उमेदवारीसाठी मोठी रस्सीखेच होणार आहे.
काँग्रेस करणार उमेदवारांची अदलाबदलकाॅंग्रेस, उद्धवसेना, राष्ट्रवादी काॅंग्रेस शरदचंद्र पवार पक्ष यांनीही निवडणुकीची तयारी सुरू केली असली, तरी काँग्रेसपेक्षा अन्य दोन पक्षांत तुलनेने इच्छुकांची संख्या कमी असणार आहे. त्यामुळे काँग्रेस उमेदवारांची अदलाबदल करून महाविकास आघाडीचा नगरसेवकांचा आकडा वाढविण्याचा प्रयत्न केला जाण्याची शक्यता आहे. असे प्रयोग आमदार सतेज पाटील यांनी पूर्वी केले आहेत व त्यात ते यशस्वीही झाले आहेत.